कऱ्हाड : पाच वर्षांहून अधिक काळ अविनाश मोहिते कारखान्याचे संचालक आहेत. मात्र, त्या काळात संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत सभासदांच्या प्रश्नांवर एकदाही तोंड न उघडले नाही. तर वार्षिक सभेत प्रत्यक्ष उपस्थित असूनही ते मूग गिळून गप्प बसले होते. सभेत गोंधळ करण्याची संधी न मिळाल्यानेच त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, निवडणूकीच्या तोंडावर निव्वळ स्टंटबाजी केली आहे, अशी टीका कृष्णा कारखान्याचे उपाधक्ष जगदीश जगताप यांनी केली आहे.
निवडणूकीच्या तोंडावर निव्वळ स्टंटबाजी करण्याचा रोग अविनाश मोहिते यांना जडलाय असा प्रश्न कृष्णाकाठी सगळ्यांनाच पडला आहे, असेही श्री. जगताप यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मुळात त्यांनी कारखान्याचा अहवाल नीट वाचला असता तर त्यांना प्रश्नच पडले नसते. कारखान्याच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील अहवालाबाबत काही प्रश्न असल्यास ते 23 मार्चपर्यंत सभासदांकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार श्री. मोहिते यांच्यासह अन्य सभासदांचे लेखी प्रश्न आले होते.
या प्रश्नांपैकी सभेशी निगडीत असलेल्या प्रत्येक प्रश्नांबाबत अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांच्या सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. असे असतानाही आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, असा खोटा कांगावा मोहितेंकडून सुरू आहे. श्री. जगताप म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या डिस्टलरीच्या नफ्याबाबत प्रश्न विचारताना अविनाश मोहिते यांनी तो अहवालात कुठल्या पानावर नमूद आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अहवाल वाचलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृष्णा कारखान्याच्या डिस्टिलरीला 30 कोटी 75 लाख 11 हजार 322 रुपयांचा नफा झाल्याचे अहवालाच्या पान 61 वर स्पष्टपणे नमूद असतानाही, ते वाचण्याचे कष्ट मोहिते घेणार की नाही. ज्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने गेल्या 35 वर्षात हजारो रूग्णांचे प्राण वाचविले, त्या संस्थेवर राजकीय आकसापोटी मोहिते वारंवार टीका करतात. वास्तविक ट्रस्टसंबंधीचा त्यांचा प्रश्न कारखान्याच्या कामकाजाशी निगडीत नाही.
तरीही त्यांनी आता निमित्ताने हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने, त्यांनी अभ्यास वाढवावा. विरोधक समोर असल्यामुळे आम्हाला झोंबण्याचे काही कारण नाही. उलट सभा खेळीमेळीत पार पडल्याने मोहितेंना पोटशूळ उठला आहे. त्यांच्या मनातील हीच खदखद त्या निमित्ताने बाहेर पडली आहे. श्री. जगताप म्हणाले, आधुनिकीकरणामुळे कारखान्याचा मोठा फायदा झाला आहे. गाळप व उताऱ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
अविनाश मोहिते यांनी अहवालातील आकडेवारी नीट अभ्यासली तर त्यांच्या लक्षात येईल, की त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात प्रतिदिन सरासरी 6600 मे. टन गाळप होत होते, जे आधुनिकीकरणामुळे आता प्रतिदिन सरासरी 7600 मे. टन गाळप होत आहे. म्हणजेच दररोज जवळपास 1000 मे. टनाने गाळप वाढले आहे. शिवाय उताराही वाढला आहे. उतारा वाढला याचा अर्थ स्पष्ट आहे, की हंगामात 1 लाख साखर पोती जास्त उत्पादीत झाली. मग उतारा वाढणे चांगले की वाईट? हे त्यांना समजत नसेल तर दुर्दैव आहे.
एफआरपी देणार.....
कृष्णा कारखान्याने पाच वर्षात कधीही एफआरपी थकवलेली नाही. उलट सर्वाधिक एफआरपी दिली. यंदाचा हंगाम अजूनही सुरू आहे. यंदाचा हंगाम संपल्यानंतर आसपासच्या अन्य कारखान्यांशी सल्लामसलत करून शिल्लक एफआरपी अदा केली जाणार आहे, असेही उपाध्यक्ष जगताप यांनी स्पष्ट केले.
सातारा सातारा सातारा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.