पाथर्डी : तालुक्यात भाजपातील नाराज मडंळीची कोंडी झाली आहे. पक्षात रहावे तर नेतृत्व साथ देत नाही. बाहेर जावं तर नेता कोण स्विकारावा, असा प्रश्न आहे. पालिकेतील नगरसेवकांमधे पक्षातंराचे वारे वाहत आहेत. निवडणुकीपुर्वी ही खदखद बोहेर पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्याभोवती चार जणांचे तयार झालेले कडे भेदुन त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कार्यकर्त्यांसाठी खडतर झाल्याची भावना जवळचे सहकारी व्यक्त करीत आहेत. नेतृत्व आमचा फोन उचलत नाही व कुणीतरी काही कान भरले, की आम्ही केलेल्या कामावरच संशय घेतला जातो, अशी अनेकांची तक्रार आहे. (कै.) राजीव राजळे होते, तेव्हा बोलता तरी यायचे. आता अडचण झालीय, असे म्हणुन कपाळावर हात मारुन घेणारांची संख्या वाढत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरविल्याने नेत्यांसाठी जीवाचं रान करणारे कार्यकर्ते आता शेतात जाऊन काम करताना दिसत आहेत. पक्ष व नेत्यांसाठी काम केले, त्यानंतर कोरोना आला. आर्थिक मंदी समोर ठाकली. उत्पन्नाचे मार्ग बदलले. त्यामुळे युवक रोजगाराच्या शोधात फिरत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्या फळीतील व गाव पातळीवरील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा अपवाद वगळता बहुतेक संस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. दुष्काळी समजला जाणार तालुका आता दुधा-तुपासह फळबागेचा तालुका म्हणुन नव्याने ओळख निर्माण करतो आहे. इथे शिक्षण घेऊन पोलिस भरती व सरकारी नोकरीत जाणारांची संख्याही मोठी आहे. अधिकारी होण्याची स्वप्न पाहुन ती कवेत घेणारे युवक-युवती वाढत आहेत. राजकीय पक्षाचे नेतेमंडळी निवडणुका आल्या की युवक वर्गाचा फायदा राजकराणात कसा करुन घेता येईल, यासाठी प्रयत्न करीत असतात. तालुक्यात युवकांनी विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे जीव तोडुन काम केले. रोजगार देण्याचा शब्द हवेत विरल्याने युवक वैफल्यग्रस्त झाले आहेत. नवीन सरकार काहीतरी करील, अशी आशा होती. कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिवसेनेत पोकळी शिवसेनेचे नेते अनिल कराळे यांच्या निधनामुळे शिवसेनेतही नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. राजकीय कार्यकर्ते सैरभेर झाले आहे. आता रोजगार शोधावा लागेल, पण त्यासाठी मदत करणारे हातही नाहीत. नेते संपर्कात नाहीत व कार्यकर्ते वाट पाहुन दुसऱ्या वाटा शोधत आहेत. राष्ट्रवादीतही शांतता दुसरीकडे राष्ट्रवादीत भयानक शांतता आहे. अॅड. प्रताप ढाकणे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रशेखर घुले यांचा पाथर्डीशी संपर्क तुटल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. सत्ताधारी असुनही राष्ट्रवादीतील शांतता वादळापुर्वीची असल्याचे बोलले जाते. Edited By - Murlidhar Karale