Nana Patole - Devendra Fadanvis
Nana Patole - Devendra Fadanvis  
राज्य

सोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरूण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न : नाना पटोले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. (The Modi government failed miserably in handling the Corona crisis) खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामीसारखे संकट असल्याचा इशारा दिला होता. परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत (Devendra Fadanvis) सर्व भाजप नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, असे म्हणत दुर्लक्ष केले. सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे घणाघाती उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee's President Nana Patole) यांनी दिले आहे.

पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासकट भाजप नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून मोदी सरकारने या संदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही, हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. गेल्या ७० वर्षांत कधी भारताची झाली नव्हती, एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे.

मोदी सरकारने राज्यांना भरभरून रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन व वैद्यकीय मदत पुरवली, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. यावर सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयांनी शिक्कामोर्तब केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले आहे. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या प्रत्यक्षात केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ऑक्सिजन प्लान्ट उभारला नाही. महाराष्ट्राची रोजची ऑक्सिजनची गरज १७५० मेट्रिक टन आहे. यातील १२०० मेट्रिक टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो. यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मेट्रिक टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता, तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. 

देशातील जनता रेमडेसिव्हिर मागत असताना भाजपचे नेते रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते. स्वतः देवेंद्र फडणवीसही एका काळाबाजार करणा-या कंपनीच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यरात्री पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ घालत होते. रेमडेसिव्हिर साठेबाजीप्रकरणी अहमदनगरच्या भाजप खासदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. पीएम केअर फंडातून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्येही घोटाळा असून अनेक व्हेंटीलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याने वापराविना धुळखात पडून आहेत.

महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे आकडेवारी देत आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, बिहारमध्ये किती कोरोना चाचण्या होतात? किती रुग्णांना ऑक्सिजन मिळतो? कोरोनाने भाजपशासीत राज्यात किती मृत्यू होत आहेत? याची माहिती फडणवीसांनी भाजपाध्यक्षांना पत्र लिहून मागवावी. गुजरातमध्ये ७१ दिवसांत १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू झाले असताना सरकार मात्र फक्त ४२१८ मृत्यू दाखवत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहारमध्ये कोरोना मृत्यू लपवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने निर्दयीपणे मृतदेह पुरले जात आहेत. तर हजारो मृतदेह गंगा नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत. हे विदारक चित्र जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

जग लसीकरणात व्यस्त असताना मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त होते. मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली असताना केंद्राला १५० रुपये, राज्यांना ४०० रुपयांना खासगी व्यक्तींना ६०० रुपयांना ती विकत का घ्यावी लागत आहे. एवढे अडथळे असतानाही महाराष्ट्राने आतापर्यंत विक्रमी १ कोटी ९५ लाख ३१ हजार नागरिकांचे लसीकरण केले जे देशात सर्वात जास्त आहे. दररोज सहा लाख  
 

 नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता आहे. वेस्टेजही देशात सर्वात कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीती आयोगासह जागतिक स्तरावरही मुंबईच्या कोरोना नियंत्रण मॉडेलचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने नोंदणीकृत रिक्षा चालक, कामगारांसह आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी १५०० रुपयांची थेट मदत देण्यासाठी ५४७६ कोटींचे पॅकेज दिले आहे. कोरोना काळात गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे. सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. ही सर्व मदत लाभार्थ्यांना पोहोचली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पोकळ पॅकेजचे काय झाले? हे फडणवीसांनी सांगावे.

काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधींना पत्र लिहिण्याऐवजी फडणवीसांनी ‘नमामी गंगेला शवामी गंगे’ बनविणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहावे. गोव्यात ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडून मरत आहेत. त्या गोव्याचे मुख्यमंत्री, गुजरातमध्ये लाखो लोकांच्या मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत, त्या गुजरातचे मुख्यमंत्री आणि या सर्वांचे पालक ज्यांच्या गलथानपणामुळे देशात कोरोना स्थिती बिकट झाली आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवे होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना युनोत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अटलबिहारी वाजपेयींना दिली होती. गुजरात भूकंपानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे देशाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांच्यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी जबाबदारी दिली होती. राष्ट्रीय आपत्ती काळात सर्वांनी सोबत येऊन काम करण्याची आपल्या देशाची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेचे पाईक म्हणून संकट काळात आपण जे गलिच्छ राजकारण करत आहोत, ते योग्य आहे का? याचे आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावे, असेही पटोले म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT