Anil Deshmukh - Devendra Fadanvis
Anil Deshmukh - Devendra Fadanvis 
राज्य

गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे असा लेटरबॉंब आज परमबिरसिंह यांनी फोडला आहे. पोलिस दलाचं खच्चिकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. खुद्द गृहमंत्र्यांवर येवढे गंभीर आरोप झाले असताना त्यांना आता गृहमंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, नाहितर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज येथे पत्रकारपरिषदेत म्हणाले. 

फडणवीस म्हणाले परमबिरसिंह यांना पत्रामध्ये जे चॅट लावले आहे, ते अतिषय गंभीर आहेत. ज्या आत्मविश्‍वासाने त्यांना पत्रात गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत, तो महत्वाचा आणि मोठा पुरावा आहे. पोलिस दलाचे खच्चिकरण करणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत झाला पाहीजे. राज्य सरकारला ते मंजूर नसेल, तर न्यायालयीन चौकशी करावी. पण निष्पक्ष चौकशी आता व्हायला पाहीजे. इतिहासातील ही पहिली अशी घटना आहे की परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आणि त्यात ते म्हणत आहेत की, आपल्याला (मुख्यमंत्र्यांना) मी ही बाब सांगितली होती. मग त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय केले? की त्यांनीही या प्रकाराला मुकसंमती दिली, हा प्रश्‍न येथे उपस्थित होतो आहे. 

परमबीरसिंह स्वतःला वाचवण्यासाठी हा प्रकार करीत आहे, असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. पण येथे हा येथे मुद्दाच नाही. पत्रामध्ये सांगितलेला चॅट हा मोठा पुरावा आहे. त्यामुळे परंबिरसिंह केवळ स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाटत नाही. पोलिस दलाला बदनाम करणारी ही घटना आहे. पोलिस दलाच खच्चिकरण करण्याचं हे पाप आहे आणि ही घटना त्याचा कळस आहे. दुर्दैवाने इतक्या वाईट पद्धतीने ही परिस्थिती समोर आल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आता झालीच पाहीजे.

गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत असत. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांनी जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असाही आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मंत्र्यांनाही ही बाब सांगितल्याचे परमबिरसिंह यांनी म्हटल्यामुळे हे प्रकरण सध्या दिसत आहे, तेवढे सोपेदेखील नाही. आता यानंतर पुढे काय काय धक्के सरकारला बसतात, याचीच चर्चा रंगली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT