sangram jagtap
sangram jagtap 
राज्य

`शिवभोजन`बाबत तक्रार देऊन आमदार जगताप यांचा घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो

नगर : शहरातील 10 शिवभोजन केंद्रचालकांनी 20 दिवसांत एक लाख 117 लोक जेवल्याची माहिती शासनाला दिली. मात्र, सोशल डिस्टन्सिंग ठेवून एवढे लोक कसे जेवले, याबाबत शंका आहे. शिवभोजन केंद्रांकडून शासनाची फसवणूक होत असल्याची तक्रार आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे. 

महाविकास आघाडी सरकारने गरजूंच्या सोयीसाठी 10 रुपयांत शिवभोजन योजना सुरू केली. मात्र, योजनेचा मूळ हेतू बाजूला ठेवून आर्थिक हित साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असताना, शहरातील 10 शिवभोजन केंद्रांवर 22 एप्रिल ते 10 मे या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून एक लाख लोक प्रत्यक्ष जेवल्याचे प्रथमदर्शनी अशक्‍य आहे. शिवभोजनाची सेवा पुरविणाऱ्या हॉटेलचालकांनी बोगस व खोटी माहिती पुरवून फक्त थाळ्यांची संख्या वाढवून शासनाची फसवणूक केल्याचे सिद्ध होते. ही गंभीर बाब असून, याबाबत यापूर्वीही संबंधित खात्याकडे चौकशीसाठी तक्रार केली आहे. याबाबत स्वतंत्र फिर्याद दाखल करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

हेही वाचा...

एमआयडीसीच्या विकासासाठी कटिबद्ध 

एमआयडीसीतील उद्योग-व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी पाच वर्षांमध्ये राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. एमआयडीसीत पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास मोठमोठे उद्योग-व्यवसाय येण्यास तयार होतात. शहराचा विकास औद्योगिक वसाहतीवर अवलंबून असतो. उद्योग-व्यवसायांमुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळते. त्यामुळे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात झाल्यास व्यावसायिकांना चालना मिळते. यासाठी एमआयडीसीच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. निंबळक बाह्यवळण ते मनमाड बायपास रस्त्याच्या कामासाठी 21 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. हे काम सुरू झाले असून, डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

निंबळक बाह्यवळण रस्ता ते मनमाड महामार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. नगरसेवक कुमार वाकळे, जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे, एमआयडीसीचे उपअभियंता गणेश वाघ, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अशोक सोनवणे, दौलत शिंदे, हनुमंत कातोरे, विष्णू भोर, पोपट बारस्कर, ज्ञानदेव कापडे उपस्थित होते. 

आमदार संग्राम जगताप म्हणाले, की या रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे एमआयडीसीने लक्ष द्यावे. चांगल्या दर्जाचा रस्ता झाला पाहिजे. एमआयडीसी परिसरातील दळणवळणाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. एमआयडीसीतील हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामधून बाहेर पडून उद्योग-व्यवसायांना चालना देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT