राज्य

ट्‌वीटर वादावर केशव उपाध्ये म्हणतात, "राज्यात लोकशाही नाही, मुस्कटदाबी होते आहे'

सरकारनामा ब्युरो

नाशिक ः नागरिकत्व विधेयक (सीएए) हे देशहिताचे आहे. त्याला सर्व समाजातील नागरिकांचा पाठींबा मिळत आहे. त्यामुळेच धास्तावलेला कॉंग्रेस पक्ष त्याला विरोध करीत आहे. त्यासाठी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांच्याविरुद्धचे आंदोलन तसेच ठाकरेंविरुद्ध फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्याचे मुंडन केल्याने राज्यात सध्या लोकशाही नाही, तर मुस्कटदाबी होते आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

"सीएए' विधेयकाविषयी वाढता विरोध आणि विविध भागात होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर ते आज नाशिक येथे आले होते. यावेळी पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हे विधेयक देशहिताचे आहे. मात्र काही लोक राजकीय हेतूने त्याच्या विरोधात प्रचार करीत आहेत. सरकार मुस्लीम धर्मियांच्या विरोधात नाही. गेल्या पाच वर्षात सरकारने 566 मुस्लीम धर्मियांना नागरीकत्व दिले आहे.

ते पुढे म्हणाले, देशाची फाळणी धर्माच्या नावाने झाली हे कटुसत्य आहे. ते स्विकारले पाहिजे. 1950 मध्ये भारत पाकीस्तान यांच्या दरम्यान करार झाला. त्यानुसार अल्पसंख्यांक समाजाला संरक्षण बंधनकारक होते. मात्र पाकीस्तानने त्या कराराचे पालन केलेले नाही. अनेकदा हे उघड झाले आहे. हे वास्तव लक्षात घेऊन सरकार काही काम करीत आहे. त्यामुळे सर्व समाजातील लोकं आता या विधेयकाच्या बाजूनं उभे रहात आहेत. मात्र मतांच्या राजकारणासाठी कॉंग्रेस गैरसमज पसरवत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT