Sarkarnama
Sarkarnama 
राज्य

महाराष्ट्राचे पोलिस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत...

मनोज भिवगडे

अकोला : एक पोलिस आयुक्त पत्र लिहितो. नारायण राणे Union Minister Narayan Rane यांना अटक कशी करावी, याबाबत पोलिसांना सूचना देतो. कोणतेही गुन्हे दाखल करा, नियमात बसत नसेल तरीही गुन्हे दाखल करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या जात असल्याचा आरोप भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे BjP's Gereral Secretary Chandrashekhar Wankule यांनी केला आहे. पोलिस हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत. काही ठिकाणी शिवसेनेचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.  

राज्यातील अनागोंदी कारभार हा तीन चाकी ऑटोप्रमाणे काम करणाऱ्या राज्य शासनातर्फे सुरू आहे. ज्या दिवशी महाराष्ट्राच्या हातामध्ये बटण येईल; त्या दिवशी तीन चाकाच्या या ऑटोचे चाकच पंक्चर होणार नाही तर या ऑटोचे स्‍क्रॅपही कुणी विकत घेणार नाही, असा टोला भाजपचे महासचिव माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. 

अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आमदार गोवर्धन शर्मा, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, महापौर अर्चना मसने, शहराध्यक्ष विजय अग्रवाल, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जयंत मसने, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रवक्ता गिरीष जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले, की एक पोलिस आयुक्त पत्र लिहितो. नारायण राणे यांना अटक कशी करावी, याबाबत पोलिसांना सूचना देतो. कोणतेही गुन्हे दाखल करा, नियमात बसत नसेल तरीही गुन्हे दाखल करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिस हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत. काही ठिकाणी शिवसेनेचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील पोलिस कधीही असा नव्हता. जगातील उत्तम पोलिस महाराष्ट्रातील आहे, असेही ते म्हणाले. उद्या राज्य आमचं आलं तर आम्ही असं करायचं, त्यांच आलं तर त्यांनी तसं करायचं. काय होईल महाराष्ट्राचे? त्यामुळे या पूर्ण घटनेवर लोक लक्ष देऊन आहेत. १२ कोटी जनता ही आंधळी नाही, सुसंस्कृत आहे. या महाराष्ट्राच्या हातात बटण आल्यानंतर जनता त्यांना योग्य जागा दाखवेल, असे बावनकुळे म्हणाले. 

ओबीसींच्या आरक्षणाआड येणारा शुक्राचार्य कोण?
ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. येत्या काळात ८५ टक्के महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. डिसेंबरपर्यंत राज्य सरकारकडे वेळ आहे. ओबीसीवर होणार अन्याय दूर करण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यात ओबीसींचा डेटा तयार होऊ शकतो. डिसेंबरला आरक्षण टाकता येऊ शकते. फेब्रुवारी, मार्चच्या महापालिकेच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू शकते, असेही ते म्हणाले. परंतु, या सरकारला असे करायचे नाही आहे. ओबीसींच्या आरक्षणाआड येणारा राज्य सरकारच्या झारीतील शुक्राचार्य कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

कुणाच्या दबावाखाली  काम?
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अनेक ठिकाणी शून्यावर आली आहे. असे असतानाही मंदिर उघडण्यास परवानगी नाही. मंदिरांबाहेर गर्दी व मंदिरांचे दार बंद, हे राज्य शासनाचे धोरण आहे. मंदिरे बंद ठेवूनच १४ महिने मंत्रालयात पाय न ठेवणारे मुख्यमंत्री देशात सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले आहेत का? कुणाच्या दबावाखाली हे सरकार काम करीत आहे. कुण्या एका पक्षाचे ध्येय धोरणे राबविण्यासाठी मंदिरे बंद ठेवली जात असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT