Sanjay and Sheetal Rathod
Sanjay and Sheetal Rathod 
राज्य

राठोडांना पाठिंबा देण्यासाठी पत्नी आणि मेव्हणा पोहरादेवीला जातीने हजर

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : बीड जिल्ह्याच्या परळी येथील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात विरोधकांचा निशाणा ठरलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड गेल्या १५ दिवसांपासून गायब होते. आज सकाळी ते पत्नी शीतल आणि मेव्हणा सचिन नाईक यांच्यासोबत बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे पोचले. पोहरादेवी येथून सुरुवात करून त्यांच्या मतदारसंघात देवदर्शनाचा सपाटा आज त्यांनी लावला.  या दर्शन दौऱ्यातून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

संजय राठोड आज पोहरादेवीत येणार असल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये फिरत होती. त्यानुसार काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी कालच पोहरादेवीकडे कूच केली होती. काही प्रतिनिधी कालपासूनच पोहरादेवीत तळ ठोकून होते. राठोड येणार हे नक्की होते, पण कोठून येणार, हे कुणालाच माहिती नव्हते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ते यवतमाळ येथे त्यांच्या निवासस्थानीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज सकाळपासूनच त्यांचे नातेवाईक आणि परिवारातील लोकांनी त्यांच्या घरी गर्दी केली होती. घरी आलेल्या सर्वांची भेट घेतल्यानंतर राठोड पत्नी आणि मेव्हण्यासोबत पोहरादेवीकडे निघाले. त्यांचा मुलगा सोहम आणि मुलगी दिव्या हेसुद्धा दर्शनाला जाणार होते, पण त्यांची परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांना घरी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. 

संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दिग्रस, दारव्हा आणि नेर या तिन्ही तालुक्यांत त्यांनी सपत्नीक दर्शन घेतले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये त्यांची प्रतिमा डागाळली. त्यामुळे ती सुधारण्यासाठी आज त्यांनी सपत्नीक देवदर्शन दौरा केल्याचे बोलले जात आहे. यवतमाळमधून निघाल्यावर दिग्रस मार्गे ते पोहरादेवी येथे गेले. तेथे महंत सुनील महाराज यांनी त्यांच्यावरील ईडा, पिडा टाळण्यासाठी हवन केले. तेथे पूजा आणि दर्शन केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर मोर्चा नेर तालुक्याकडे वळवीत मानकी आंबा येथे दर्शन घेतले. नेर तालुक्यातील ८० टक्के लोक मानकी आंबा येथे नियमित जातात. येथेही दर्शन करून त्यांनी मान्यवरांच्या भेटी घेतल्या. एकंदरीत राठोड यांनी आज मतदारसंघतील तिन्ही तालुक्यांचा दौरा केला. 

१५ दिवस गायब राहिल्यानंतर त्यांना आ ना उद्या जगासमोर यायचेच होते. या १५ दिवसांत विरोधकांनी त्यांच्यावर विविध गंभीर आरोप केले. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. दिवसागणिक विरोध वाढत असल्यामुळे त्यांनी समोर येण्यासाठी देवस्थानांची निवड केल्याचेही लोक सांगतात. या प्रकरणात चौकशीनंतर काय सत्य बाहेर येते, याकडे जिल्हावासीयांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT