2balasaheb_20thorat_1.jpg
संगमनेर : "भाजप सरकारने "आरे'च्या वनक्षेत्रात प्रस्तावित केलेल्या, मुंबईतील बहुचर्चित मेट्रो कार शेड प्रकल्पाची जागा आघाडी सरकारने पर्यावरण व वनसंरक्षणाच्या चांगल्या हेतूने बदलली आहे. मात्र, दुर्दैवाने विरोधक याचे भांडवल करून राजकारण करीत आहेत,'' अशी टीका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर विधानसभा मतदारसंघात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मुंबईतील मेट्रो कार शेड प्रकल्प राजकारणाचा नाही, तर पर्यावरण रक्षणाचा भाग आहे. "आरे' विभागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून, पर्यावरण व वनप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगल्या भावनेतून कार शेडची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुर्दैवाने विरोधक त्याला विरोध करीत राजकारण करीत आहेत.'' कोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासंदर्भात बोलताना त्यांनी, राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक सरपंच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढल्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक गावपातळीवरची असल्याने, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची जबाबदारी असते. आमचाही हाच प्रयत्न असल्याचे थोरात म्हणाले. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी थोरात यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. तालुक्यातही अनेक ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात, त्यातही काॅंग्रेसचे सरपंच होण्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. Edited By - Murlidhar karale