औरंगाबाद ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण आणि मृतांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. रुळावर आलेली आर्थिक घडी, उद्योग, धंदे आणि रोजगारावर परिणाम होऊ नये याची काळजी घेत अंशत लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान शहर-ग्रामीण असा फरक न करता शनिवार,रविवार रोजी संपुर्ण लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या लग्न समारंभावर बंदी घालण्यात आली आहे.
औरंगाबादेत लाॅकडाऊन लागणार का? याची चर्चा गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात व जिल्ह्यात सुरू होती. लाॅकडाऊनच्या मुद्यावरून प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये देखील मतभेद असल्याचे समोर आले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त, महापालिका प्रशासक, पोलीस अधिक्षक यांच्या संयुक्त बैठकीत आज जिल्ह्यात शनिवार आणि रविवार पुर्णता लाॅकडाऊन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले, की लोकांना अडचण होईल, त्यांचे उद्योगधंदे, व्यवसाय बुडतील किंवा दररोज कमावून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये,याचा विचार करूनच काही निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने गेल्या काही दिवसांचा अभ्यास केला तर त्यातून प्रकर्षाने असे जाणवले की लग्न समारंभ व सार्वजिक कार्यक्रमातून होणारी गर्दी, कोरोना नियमांचे न होणारे पालन यातून शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
याला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम लग्र-समारंभावर बंदी घालण्यात आली आहे. आधी ५० जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्यास परवानगी देण्यात आली होती. पण या नियमाचे पालन कुठेच झाले नाही,त्यामुळे आता थेट लग्न समारंभ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रजिस्टर मॅरेजचा पर्याय आपण खुला ठेवला आहे. नोंदणी पद्धतीने ठरलेले विवाह करता येतील, पण कुठल्याही प्रकारचा स्वागत समारंभ घेता येणार नाही.
या शिवाय शनिवार,रविवार हे दोन दिवस पुर्णपणे लाॅकडाऊन असणार आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. जाधववाडी येथील भाजीमंडईत होणारी गर्दी पाहता बुधवारपासून ही मंडई देखील पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. व्यापारी प्रतिष्ठाने कोरोना नियमांचे बंधन पाळत रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
हाॅटेल, रेस्टाॅरंट हे क्षमतेपेक्षा पन्नास टक्केच्या मर्यादेत रात्री ९ पर्यंत सुरू राहतील. पार्सल व्यवस्था मात्र रात्री अकरापर्यंत सुरू राहील. शनिवार रविवारी फक्त घरपोच सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ११ ते ४ एप्रिल दरम्यान हे बंधन असणार आहे. यापुढे परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.