पिंपरी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३५८ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सह मुख्य आरोपी श्रावण बावणे (वय ६५) यांचा मंगळवारी झालेला अपघाती मृ्त्यूबद्दल संशय व्यक्त, करून त्याबाबत सीबीआय चौकशीची मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे. ते या महामंडळाचे माजी अध्यक्ष असल्याने त्यांचा हा आरोप गंभीर मानला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने गोरखे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
बावणे हे भंडारा कारागृहात होते. त्यांना सुनावणीसाठी मुंबईला नेण्यात आले होते. तेथून ते पोलिसांच्या गाडीने परततांना वर्धा जिल्ह्यात राजणी फाट्याजवळ ही गाडी उलटली. तिने तीन पलट्या मारल्या. त्यात तीन पोलिस जखमी झाले. तर बावणे यांचा मृत्यू झाला. त्यांचा हा मृत्यू व अपघाताबद्दल गोरखे यांनी संशय व्यक्त केला आहे.
त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याची चौकशीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. ही घटना दुर्देवी असून त्यात बावणेंचा मृत्यू होतो, तर पोलिसांना फक्त लागते हे संशयास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महामंडळातील घोटाळ्यामुळे समाज खूप मागे गेला असल्याचे सांगून या संशयास्पद घटनेतून त्याला न्याय देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. गोरखे हे फडणवीस यांच्या जवळच्या गोटातील भाजपचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यातूनच फडणवीसांच्या नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यात त्यांनी गोरखे यांच्या घरी येऊन जेवण केले होते.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या राजनी फाट्याजवळ टायर फुटल्याने वाहनाने तीन पलट्या खाल्ल्या. यामध्ये सहआरोपी श्रावण बावणे ठार झाला असून तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. हा अपघात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला.
मृत आरोपी ६५ वर्षीय श्रावण बावणे असून पोलिस कर्मचारी सावंत जाधव, शकील शेख आणि अभिषेक घोडमारे अशी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भंडारा येथील कारागृहात असलेला कैदी श्रावण बावणे याची मुंबई येथील न्यायालयात तारीख होती. भंडारा येथील तीन पोलिस कर्मचारी आरोपी श्रावणला घेऊन एम.एच. 36 2273 क्रमांकाच्या पोलीस वाहनाने मुंबई येथे घेऊन गेले होते.
शनिवारी ३ एप्रिल रोजी आरोपीची न्यायालयात पेशी आटोपल्यानंतर त्याला परत भंडारा कारागृहात परत घेऊन येत होते. राजनी फाट्याजवळ पोलिस वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने तीन वेळा रस्त्यावरच पलटले आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यात आरोपी श्रावण बावणे याचा जागीच मृत्यू झाला. तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलाच मार लागल्याने त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.