पुणे : शिवसेना व अकाली दल स्वतःहून एनडीएमधून बाहेर पडले आहेत. शिवसेनेसाठी आमची दारे बंद किंवा खुली असे काहीही घडलेले नाही. तसा कुठलाही मुद्दा नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
या मुलाखतीत अमित शहा यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एनडीएत ३० हून अधिक पक्ष आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे स्वतःहून एनडीएतून बाहेर पडले आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढलेले नाही. दोन्ही पक्षांचा कृषी विधेयकांना विरोध आहे. शिवसेनेसाठी दार उघडं किंवा बंद असं काही मुद्दा नाही. तसं काही घडलेले नाही, असं अमित शहा यांनी स्पष्ट केले.
''पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चुकीची नाही. कारण तेथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. केरळमध्ये पूर्वी ज्या पद्धतीने राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात, तशाच आता पश्चिम बंगालमध्ये होताना दिसत आहेत,'' असेही अमित शहा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. हाथरस प्रकरणात स्थानिक पोलिस स्टेशन स्तरावर चूक झाल्याचे त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरु करण्याबाबत पाठविलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यावर नाराज झाले असल्याचेही या मुलाखतीत दिसून आले. कोश्यारी यांनी लिहिलेले पत्र मी वाचले असून या पत्रातले काही शब्द त्यांना टाळता आले असते, असेही शहा या मुलाखतीत म्हणाले.
Edited By- Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.