amit shah discusses about extended lockdown with all chief ministers
amit shah discusses about extended lockdown with all chief ministers  
मुख्य बातम्या मोबाईल

लॉकडाउनबाबत अमित शहा मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संभाव्य लॉकडाउन -५ बाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची लॉकडाउनबाबची भूमिका त्यांनी जाणून घेतली. पुढील लॉकडाउनचा निर्णय या केंद्र सरकारकडून राज्यांवर सोपविला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  लॉकडाउन-5 बाबत शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. 

याआधी प्रत्येक वेळी लॉकडाउन करण्याबाबतचा निर्णय घेताना मागील तीनही वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला होता. आज शहा यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर थेट संवाद साधला. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात त्यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये 1 जूनपासून कोणते बदल करावेत, कोणत्या शहरांमध्ये निर्बंध कायम ठेवावेत यासारख्या मुद्द्यांवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि मते जाणून घेतली. देशात २५ मार्चला सर्वांत प्रथम लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर तीन वेळा लॉकडाउनची मुदत वाढवण्यात आली. तिन्ही वेळेला काही बदल केंद्र सरकारने काही नियम टप्प्याटप्प्याने शिथिल करीत राज्यांना सुरक्षित अंतर आणि इतर नियम पळून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहेत. 

देशातील ज्या शहरांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मते शहा यांनी सविस्तरपणे जाणून घेतली. सध्या लागू असलेला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा देशभरात चालू ठेवण्यासंदर्भात केंद्र सरकारला उद्यापर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे. १ जूननंतर कोणत्या क्षेत्रांमधील बंधने कायम ठेवावीत आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये सवलत द्यावी याबाबतही सर्व मुख्यमंत्र्यांची मते शहा यांनी जाणून घेतली. याचबरोबर त्यांनी काही सूचनाही केल्या. राज्यांना निर्णय घेण्याचे काही अधिकार असले तरी सुरक्षित अंतरासारखे नियम व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या  नियमांचे पालन योग्य पद्धतीने होईल, याची काळजी घ्यावी, असे शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले, असेही सूत्रांनी सांगितले. 

13 शहरांबाबत अभ्यासानंतर निर्णय 

देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या १३ शहरांमधील परिस्थितीचे अध्ययन पंतप्रधान कार्यालयाखालील एका स्वतंत्र समितीने केले आहे. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडूनही केंद्र सरकार थेट सूचना मागवत आहे. या सर्वांचा अभ्यास करून जूनमधील कोरोनाविरुद्ध लढाईची रणनीती निश्चित करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT