मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक आयटीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमधील जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये आता वाढ करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक आयटीआयने जाहीर केले आहे.
या प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 26 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 5 पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. प्रवेशाची पहिली फेरी 30 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. या फेरीची यादी 9 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर होईल. तिसऱ्या फेरीसाठी 10 ते 15 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. ता. 18 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 19 ते 23 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.
चौथ्या फेरीसाठी 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरता येतील. या प्रवेशाची यादी 28 सप्टेंबरला जाहीर होईल. आयटीआयसाठी विद्यार्थ्यांना 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रिया समाप्तीनंतर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्यासाठी 5 ऑक्टोबरपासून जिल्हास्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येईल.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.