नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले असून, ५ ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. हा दिवस जल्लोषात साजरा करण्याची तयारी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. आता या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांना उपस्थित राहण्यास एआयएमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. आम्ही या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश भय्याजी जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार यांना दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडे मंदिर निर्माण ट्रस्टने दोन तारखा पाठविल्या होत्या. यातील ५ ऑगस्ट ही तारीख पंतप्रधान कार्यालयाने अंतिम केली आहे. या तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराची पायाभरणी होईल. मोदी हे अयोध्येत सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत असतील. मंदिराच्या बांधकामाच्या तयारीचे काम काही दिवसांसाठी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबविण्यात आले होते. आता ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
ओवेसी यांनी या प्रकरणी ट्विटरवर भूमिका मांडली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राममंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान उपस्थित राहिले तर ते त्यांनी घेतलेल्या राज्यघटनेच्या शपथेचे उल्लंघन ठरेल. भारतीय राज्यघटनेचा मूळ आधार हा धर्मनिरपेक्षता आहे. अयोध्येत चारशे वर्षांपासून बाबरी मशिद होती आणि ती गुन्हेगारांच्या टोळ्यांनी १९९२ मध्ये पाडून टाकली हे कदापी विसरता येणार नाही.
राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास आणि प्रवक्ते महंत कमलनयन दास यांनी मोदी यांना पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, मंदिराच्या पायाभरणीसाठी दोन चांगले मुहूर्त शोधण्यात आले आहेत. यातील एक मुहूर्त ३ ऑगस्ट आणि दुसरा ५ ऑगस्ट आहे. ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीनुसार हा शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तारखेला हिरवा कंदील दर्शवतील ती तारीख अंतिम होईल.
ट्रस्टचे पदाधिकारी कमलेश्वर चौपाल म्हणाले होते की, पंतप्रधानांना एक तारीख निवडण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे ३ अथवा ५ ऑगस्टला मंदिराची पायाभरणी होईल. पंतप्रधान कोणती तारीख निवडतात यावर हा कार्यक्रम अवलंबून असेल. पायाभरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिराचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू होईल.
ट्रस्टची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. यातून दोन तारख्या ठरविण्यात आल्या. मंदिराच्या पायाभरणीसाठी माती परीक्षण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. लार्सन टुब्रो कंपनी हे काम करीत आहे. जमिनीखाली ६० मीटर खोलीवरील मातीची क्षमता तपासून मंदिराच्या पायाभरणीचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचबरोबर मंदिरासाठी संगमरवराचे काम सोमपुरा मार्बल ब्रिक्स कंपनीला देण्यात आले आहे.
अयोध्येत चारशे वर्षांपासून बाबरी मशिद होती आणि ती गुन्हेगारांच्या टोळ्यांनी १९९२ मध्ये पाडून टाकली हे कदापी विसरता येणार नाही.
- असदुद्दीन ओवेसी, प्रमुख, एआयएमआयएम
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.