Big upheaval in Belgaum: Congress leads with 9,000 votes
Big upheaval in Belgaum: Congress leads with 9,000 votes 
मुख्य बातम्या मोबाईल

बेळगावात मोठी उलथापालथ : काँग्रेसचे जारकीहोळी ९ हजार मतांनी आघाडीवर

सरकारनामा ब्यूरो

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात आता काँग्रेसचे सतीश जारकीहोळी हे सुमारे ९९४६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या कलामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मंगला अंगडी या आघाडीवर होत्या. त्यांची ११ हजारांची लीड तोडून जारकीहोळी यांनी आता सुमारे दहा हजारांचे मताधिक्क्य घेतले आहे.

काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना २ लाख ४७ हजार ०६२ एवढी मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या अंगडी यांना २ लाख ३७ हजार ११६ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी अंगडी यांच्यावर दहा हजार मतांची आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके मात्र तिसऱ्या जागेवर फेकले गेले आहेत. त्यांना ८१७७१ मते मिळाली आहेत.

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी भाजप, कांग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार ताकद लावली होती. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्याने राज्यात मोठा वाद झाला होता. कारण, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन प्रचार केला होता. त्यांनी बेळगावात मोठी रॅली काढली होती आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही प्रचाराला गेले हेाते. त्यावेळी जयंत पाटील, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शेळके यांनीही फडणवीस यांना लक्ष्य केले होते. 

काय म्हणाले होते शेळके

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुरुवातीपासूनच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आग्रही आहेत. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाला मात्र या प्रश्नाशी काही सोयरसुतक आहे, असे वाटत नाही. हा प्रश्न निर्माण केला, त्यावेळच्या काँग्रेसने आणि भाजपला हा प्रश्न सोडवायचा नाही. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सत्तेत (मुख्यमंत्री) होते, त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी आम्हाला साडेचार वर्षे वाट बघावी लागली होती. साडेचार वर्षांनंतर आम्ही आझाद मैदान उपोषण केले, त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली होती, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला जास्त अपेक्षा नव्हती आणि येथे येऊन ते आमच्या अपेक्षेवर खरे उतरले आहेत, असे आम्हाला वाटते, अशा शब्दांत बेळगावचे महराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता.

लोकशाही दिलेल्या अधिकारानुसार मी नवमतदार म्हणून नवव्या क्रमांकाला मतदान केले आहे. मराठी माणसाने ठरवले की आपल्याच माणसाला (महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारास) मतदान करायचे, तर विजय दूर नाही. आम्ही प्रचाराला सुरुवात केल्यापासून जे वातावरण बेळगावत तयार झाले, तसे वातावरण मी प्रथमच पाहत आहे. मला जसं समजतं, तेव्हापासून मी या लढ्याशी जोडला गेलो आहे. पण, एखाद्या निवडणुकीत एवढा उत्साह पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. आमच्या प्रचारात सुमारे ७० टक्के तरुणवर्ग सहभागी होता, त्यामुळे नागरिकांचाही मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला होता, असा दावाही शेळके यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT