Bihar IPS officer Quarantined in Mumbai by BMC
Bihar IPS officer Quarantined in Mumbai by BMC 
मुख्य बातम्या मोबाईल

#SSRSuicide बिहारचा आयपीएस अधिकारी मुंबईत सक्तीने क्वारंटाईन?

वृत्तसंस्था

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी आलेले आयपीएस अधिकारी बिनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. दरम्यान, तिवारी यांना देशांतर्गत विमान वाहतुकीबाबतच्या नियमांनुसार क्वारंटाईन करण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. 

आयपीएस अधिकारी तिवारी काल पाटण्याहून मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांना बृहन्मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सक्तीने क्वारंटाईन केल्याचे बिहार पोलिसांनी वृत्तसंस्थेला सांगितले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याचा निषेध थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 

बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या चॅप्टर 12 आणि 13 अंतर्गत बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्याचा तपास हा गुन्हा घडला तेथेच व्हायला हवा. याचबरोबर गुन्ह्याची न्यायालयीन कार्यवाहीसुद्धा याच ठिकाणी होणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी नमूद केले आहे. सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT