महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणजे मालेगाव. त्याला कोण कसे विसरेल? सध्या कोरोनाने धुमाकाळ घातला आहे. अशा स्थितीत तर ते अजिबात शक्य नाही. मात्र, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना संसर्गाची माहिती देताना नेमके मालेगावला विसरतात. का टाळतात हेच कळत नाही. कारण मालेगाव आज राज्यातील कोरोनाचा रेड स्पाॅट, खरे तर ब्लॅक स्पाॅट होऊ पाहतोय. त्यामुळे त्याचा विसर न पडता गांभीर्यानेच घेतले पाहिजे.
मालेगाव शहरात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी खास नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागला आहे. त्यानंतर त्याच्या कार्यवाहीसाठी रविवारी डाॅ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या डाॅ. आशिया यांनी काल कार्यभार स्विकारताच पहिला महत्वाचा निर्णय घेतला. त्यात पोलिसांनी संचारबंदीची सक्तीने अंमलबजावणी करावी. कोणालाही शहरात प्रवेश करता येणार नाही. कोणीही घरातून बाहेर पडणार नाही, असे सांगितले. याचे कारण आहे सलग चार दिवस येथे पाॅझिटिव्ह अहवाल येत आहेत. येथली रुग्णांची संख्या एकोणतीसवर पोहोचली आहे. ती राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत निश्चितच लक्षणीय आहे. या शहराचा ताणा बाणा, सवयी आणि नागरीकांतील सार्वजनिक व्यवहारातील शिस्तीविषयीची उदासनीता सर्वपरिचीत आहे. त्यामुळे येथे शासनाला खास लक्ष घालावेच लागेल. त्याचा उल्लेख टाळून काहीच साध्य होणार नाही, ही सामान्यांची भावना आहे.
रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट केले. त्यात राज्यातील कोरोना बाधीतांची संख्या 1895 झाल्याचे म्हटले. त्यात अन्य विविध शहरांचा उल्लेख केला. मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे महत्वाची आहेच. मात्र मालेगाव नव्हते. याचे अनेकांना आश्चर्य वाटले. देशात कोरोना विरोधात उत्तम कामगिरी व संयम कोणी दाखवला असले तर अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.30 कोटी आहे.
मात्र, सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे सर्वात वर्दळीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तेथे जगभरातून रोज लाखो प्रवासी येतात व जातात. त्यामुळे कोरोनाच्या सर्वाधीक चाचण्या करणारे महाराष्ट्र राज्या आहे. उत्तर प्रदेश, बिहार येथे चाचण्या तर दूर सुविधाही नाहीत. त्यामुळे त्या राज्यांशी महाराष्ट्राची तुलनाच होऊ शकणार नाही. पण अशा स्थितीत मालेगावची वाढती पाॅझिटिव्ह संख्या राज्याच्या उत्तम कामगिरीवर बट्टा तर लावणार नाही ना, याची चिंता आहे.
मालेगावचे एक वैशिष्ठ्ये आहे. तेच कोरोनाला सोयीचे ठरु शकते. ते म्हणजे, हे पाॅवरलूमचे, अल्पसंख्यांकाची मोठी लोकसंख्या असलेले शहर आहे. त्यात तबलीगी पंथीय लक्षणीय आहेत. नवी दिल्लीच्या मरकज कार्यक्रमाहून परतलेले लोक येथे आहेत. मात्र त्यांचा पत्ताच लागत नाही. पाॅवरलुममुळे येथील नागरीकांची फुफ्पुसे कमकुवत झाली आहेत. मोठ्या संख्येने क्षयरोगाचे रुग्ण येथे आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे शहर लहान लहान घरांमुळे घरात कमी, रस्त्यावर अधिक असते. मध्यरात्रीपर्यंत रमणारे हे शहर आहे.
येथील एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनाच होम क्वारंटाईन करावे लागले. त्यांनी स्वतःच त्याचे वारंवार उल्लंघन केले. तर त्यांचे अनुयायी, नागरीक त्यांचा आदर्श घेणारच. आणि तसेच दिसून देखील आले. येथील पाॅझीटिव्ह रुग्णांच्या घराचा, कुटुबीयांचा शोध घेण्यास गेले असता ते सापडलेच नाही. त्यांनी मोबाईल स्वीच आॅफ केले होते. याचा अर्थ ते अज्ञानी निश्चितच नाहीत, समाजाप्रती उदासीन निश्चित आहेत. रविवारी तर आरोग्य कर्मचारी नागरीकांच्या असहकार्याने मेटाकुटीला आले होते. आता त्यासाठी पोलिस मदतीला येणार आहेत. ही सर्व स्थिती बोलकी आहे.
राज्याचे कृषीमंत्री, शिवसेना नेते दादा भुसे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. शहरात एमआयएमचे मैलाना मुफ्ती आमदार आहेत. शहरात, महापालिकेवर काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि भक्त मंडळी कोरोना विषयाचे सुद्धा राजकारण करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री टोपे यांनी मालेगावला विसरु नये. उलट त्यात अधिक लक्ष घालावे. हीच सुज्ञ मालेगाववासीयांची अपेक्षा असेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.