मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री व विधीमंडळाचा अवमान केल्याबद्दल रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा ठराव मांडला. या ठरावावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सभागृह अध्यक्षांनी यावेळी सांगितले. या मुद्द्यावरुन विरोधी बाकांवरील भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. या मुद्द्यावरुन झालेल्या घोषणाबाजीनंतर उपाध्यक्ष व पीठासीन अध्यक्ष नरहरी झीरवाळ यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
प्रताप सरनाईक म्हणाले, " रिपब्लिक टीव्हीचे मालक संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात मी विशेषाधिकार भंगाचा व अवमानाचा प्रस्ताव मांडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका अभिनेत्याच्या मृत्युप्रकरणी कपोल्कल्पित चर्चा या वाहिनीवर सुरु आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री, अनेक सदस्य, अनेक मंत्री यांच्या विरोधात एकेरी शब्दांचा उल्लेख करुन लोकशाहीची थट्टा चालवली आहे. टीआरपीसाठी हे चालले आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. पूर्वी चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना मानाचे स्थान असायचे. खोटे सरकारने केले तर खरं करुन दाखवायची मनःस्थिती व मानसिकता असायची.गोस्वामी यांनी आक्षेपार्ह्य व हेतुपुरस्सर विधाने केली आहेत. त्याचा मी निषेध करतो,"
अनिल परब यांनी या ठरावाबाबत बोलताना अत्यंत आक्रमक भाषण करत भूमीका मांडली. ''डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसार माध्यमांना ही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात अस घटना म्हणते. अर्णब हा स्वतःला न्यायाधीश समजतो. हा कोण पत्रकार आहे? तो सुपारी घेऊन काम करतोय. असा अपमान करणाऱ्या या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे.'' एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला ,म्हणून त्यांनी काहीही करायचं का, असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.