British Foreign Minister told Gadkari the problems in the European country
British Foreign Minister told Gadkari the problems in the European country 
मुख्य बातम्या मोबाईल

ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गडकरींना सांगितली युरोपियन देशातील समस्या

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : मी ब्रिटनमध्ये गेलो होतो, त्यावेळी त्यांच्या परराष्ट्र मंत्र्याने त्यांच्याकडील समस्या सांगितली होती. आमच्या युरोपियन देशांतील परिवार पद्धती उद्‌ध्वस्त झाली आहे. त्यावर त्यांनी तुमच्याकडे ही समस्या आहे का विचारले, त्यावेळी मी सांगितले की आमचा देश गरीब जरूर आहे. पण आमची समाजपद्धती, परिवारपद्धती आणि जीवनपद्धती आणि शिक्षणपद्धती ही संस्कारावर आधारित आहे. त्यामुळे ही समस्या आमच्याकडे नाही, असे उत्तर मी त्यांना दिले, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. (British Foreign Minister told Gadkari the problems in the European country)

शिक्षकदिनानिमित नागपूरमधील साऊथ पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात गडकरी बोलत होते. या वेळी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापक हा शैक्षणिक परिवार आहे. या परिवाराच्या सहकार्यातून ही बालके उद्या मोठी होणार आहेत. मूल्याधिष्ठ शिक्षणपद्धती ही आपल्या समाज जीवनाची मोठी विशेषतः आहे. मला ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली होती. भाषणानंतर मी त्यांच्या पंतप्रधानांकडे चहा घेऊन परराष्ट्रमंत्र्यांकडे गेलो, त्यावेळी माझ्यासोबत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि स्मृती इराणीही होत्या. 

चहा पित असताना मला त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक प्रश्न विचारला. हिंदुस्थानमध्ये खूप गरिबी, भूकमारी, बेरोजगारी आहे, तर तुमच्या देशातील सर्वांत मोठी समस्या हीच आहे का? त्यावेळी मी त्यांना म्हटले की होय हे खरंच आहे की आमच्या देशातील सर्वात मोठी समस्या ही गरिबी आणि भूकमारीची आहे. देश खूप मोठा आहे. देश धनवान आहे; पण जनता गरीब आहे. त्यानंतर मी त्यांना उलटा प्रश्न विचारला की तुमच्या देशातील सर्वात मोठी समस्या कोणती? त्यांनी मला असं सांगितले की, आमच्या युरोपियन देशातील परिवारपद्धती उद्‌ध्वस्त झाली आहे. आमच्या मुली लग्न होण्याआधीच ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहतात आणि माता बनतात. त्यामुळे समाज व्यवस्थेत एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यांनी मला उलट प्रश्न केला की, तुमचा देश गरीब आहे, मग तुमच्याकडे ही समस्या नाही का? त्यावर मी त्यांना उत्तर दिले की, नाहीच्या बरोबर आहे. ते म्हणाले की, हे कसं शक्य आहे? त्यावर मी त्यांना सांगितले की, आमचा देश गरीब जरूर आहे. पण आमची समाजपद्धती, परिवारपद्धती, जीवनपद्धती आणि शिक्षणपद्धती ही संस्कारावर आधारित आहे. ज्येष्ठ नागरिकांना मान दिला पाहिजे. खरं बोललं पाहिजे. ही मूल्ये भारतीय समाजाची शक्ती आहे. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून देणे हा मोठा संस्कार आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, शैक्षणिक संस्थेचे मूल्यमापन हे संबंधित संचालक आणि शिक्षकांवरून होते. ते कोणत्या गुणवत्तेचे आहेत, त्यावर संस्थेचे भविष्य अवलंबून असते. भविष्यातील नागरिक शिक्षणाच्या संस्कारातून घडतो. आपले जीवन घडविणारे आपले शिक्षक आहेत, त्यांच्यामुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तमरित्या घडविले तर आपण नक्कीच आत्मनिर्भर भारत म्हणजेच, शक्तीशाली, समृद्ध भारत घडवू. व्यक्तींचा समूह समाज असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT