मुंबई : महाविकासआघाडी सरकारला कोरोनाची परिस्थिती नियंत्रणास आणण्यात सपशेल अपयश आले असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निष्क्रियताच याला कारणीभूत आहे. निर्णय घेण्यास मुख्यमंत्री सक्षम नसुन ते फक्त मातोश्री पुरताच मर्यादित आहेत अशी टीका भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी मुंबई येथे केली.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, ''राज्यात कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यास त्यावर उपाययोजना शोधण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. कोरोनाच्या प्रश्नांवर मंत्र्यांच्या बैठका सुद्धा आयोजीत केल्या जात नाहीत. मुख्यमंत्री हे मातोश्रीच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्यामुळे मंत्रालय हे मुख्यमंत्री सांभाळत नसून अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. प्रशासन हाताळण्यास आणि निर्णय घेण्यास ते सक्षम नाहीत.''
''राज्याला या चार महिन्यात १० वर्ष मागे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या काळात कोरोना योद्धे डॉक्टर, परिचारिका यांचे पगार दिले नसून बेस्ट कर्मचाऱ्यांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. एक महिना उलटून गेला तरी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आर्थिक मदत मिळालेली नाही,'' असेही नारायण राणे म्हणाले. कोरोनाच्या कठिण काळात राजकारण करू नये असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येते पण या संकटाचे निवारण करण्याची ताकद या सरकारमध्ये आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.