राहुरी (जि. नगर) : "मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो. तेव्हा माझ्याकडे तीन खाती होते. आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सहा खाती मिळाली आहेत. त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांकडे लक्ष द्यावे. तसेच, निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांसाठी मामांच्या (जलसंपदा मंत्री जयंत पाटील) मागे लागा; अन्यथा तुमचा मामा होईल,'' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्री तनपुरे यांची फिरकी घेत, ""या प्रश्नी मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. जिल्ह्यातील नवे चेहरे उत्साहात विकासकामे करतील. मतदारांनी त्यांना यापुढेही साथ द्यावी,'' असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत वांबोरी, आरडगाव, ताहाराबाद, बाभूळगाव, गणेगाव व शिरापूर (ता. पाथर्डी) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन, राहुरी खुर्द येथील वीज उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफार्मरचे लोकार्पण राहुरी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार बोलत होते.
या प्रसंगी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहु कानडे, आमदार आशुतोष काळे, निर्मला मालपाणी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अनुराधा आदिक, बेबी सोडनर, धनराज गाडे, अनिता पोपळघट, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, मच्छिंद्र सोनवणे, धीरज पानसंबळ, संतोष आघाव, गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डिले उपस्थित होते.
निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी देऊ. राहुरी बस स्थानकाच्या साडेसतरा कोटी रुपयांच्या इमारतीचा प्रस्ताव माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पाठपुरावा करून पाठविला आहे. त्यासाठी येत्या वर्षभरात खर्च होईल, तेवढ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल, अशी घोषणा या वेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
"राहुरी मतदार संघातील सहा सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर 19 मेगावॉट वीजनिर्मिती होऊन, 19 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. कोरोनामुळे मागील वर्षी विकास कामांना ब्रेक लागला. आता निधी कमी पडू देणार नाही. नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण निधी देण्यास सुरुवात होईल. राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांचे 45 हजार 706 कोटी वीजबिल थकीत आहे. नवीन ऊर्जा धोरणात थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करून राहिलेल्या बिलात 50 टक्के सवलत आहे. ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी थकबाकी भरून सहकार्य करावे,' असे आवाहन पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे अण्णा हजारे यांच्यावर उपोषणाची वेळ आली. त्यांनी भाजप नेत्यांवर विश्वास ठेवला. उपोषणापासून परावृत्त झाले. परंतु, त्यांच्यावर पुन्हा अशी वेळ येऊ नये. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी कायदे मंजूर केले. त्याविरुद्ध दिल्ली येथे लाखो शेतकरी जिवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीला दुर्दैवाने हिंसक वळण लागले. परंतु, शेतकरी कधीही हिंसक आंदोलन करीत नाहीत. कुणीतरी गालबोट लावून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.