अगरतळा : लग्न समारंभावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा टाकला होता. त्यांनी वधू-वरासह वऱ्हाडींना अपमानित करून मंडपाबाहेर काढले. काहींना लाठ्याही खाव्या लागल्या. याप्रकरणी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करून पदावरून हटवले. पण हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. (DM shailesh yadav who forcibly stopped wedding ceremony transfferd)
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे बहुतेक सर्वच राज्यांमध्ये लग्न समारंभांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. उपस्थितांच्या संख्येसह मास्कचा वापर करण्याबाबत नियम करण्यात आले आहेत. त्याचे पालन केल्यास कारवाई केली जात आहे. पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी काही दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात छापा टाकला होता. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटाही होता. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.
भाजपच्या आमदारांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केल्यानंतर राज्य शासनाकडून चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीसमोर यादव यांनी आपली बाजू मांडली. तसेच लोकांच्या भावना दुखवण्याचा उद्देश नसल्याचे म्हणत याप्रकरणी माफीही मागितली. पण राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यांना निलंबित करून पदावरून हटवले. पण ते पश्चिम त्रिपुरामध्ये होते.
हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. न्यायालयाने शासनाला यादव यांच्यावर काय कारवाई केली, असा प्रश्न विचारला. त्यावर शासनाने त्यांना पदावरून मुक्त केले असून सध्या ते 12 दिवसांच्या सुट्टीवर आहेत, असे सांगितले. न्यायालयाने यादव यांना अजून पश्चिम त्रिपुरातच का थांबवले आहे, असे विचारत सरकारला यादव यांच्या नवीन पोस्टिंगची माहिती अर्धा तासात देण्यास सांगितले.
न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारी वकिलांनी तातडीने प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या अन् यादव यांची बदली दक्षिण त्रिपुरातील बेलोनिया जिल्ह्यात करण्यात आली. यादव यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. दोन लग्नांमध्ये त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने ते अडचणीत आले.
टीका अन् कौतुकही
शैलेश यादव यांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणीही अनेकांनी केली. भाजपचे त्रिपुरातील पाच आमदारांनी मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्याकडे ही मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांना निलंबित केले. तसेच मुख्य सचिवांना या कारवाईची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. यादव यांच्या या कारवाईचे अनेकांनी कौतूकही केले आहे. सध्याच्या स्थितीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर अशी कारवाई झाली पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.