परळी (जि. बीड) : पक्षातील काही लोकांनी आमचा पराभव केला. याचे पुरावे चार दिवसांपूर्वीच पक्षाकडे दिले आहेत. भाजपची घसरण १०५ जागांवर का झाली याचे चिंतन करावे. जशी यशाचे श्रेय घेता तशी अपयशाचीही जबाबदारी स्वीकारा, असा टोला भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
परिसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे समर्थकांसह शहरात पोचले आहेत. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपवरील नाराजी थेट बोलून दाखवित आहेत. पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांचा पराभव भाजमधील नेत्यांनीच घडवून आणल्याचा थेट आरोप त्यांनी यापूर्वीही केला हेाता. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी भाजपने काहीच हालचाल केली नसल्याचाही थेट आरोप खडसे यांनी केला हेाता.
दरम्यान, आता गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीसाठी आलेल्या खडसे यांनी पुन्हा आपली खदखद उघड केली. गोपीनाथराव मुंडे अडचणीच्या काळात धावून येणारे नेतृत्व होते. गोपीनाथ मुंडे व तत्कालीन नेत्यांमुळे भाजप बहूजनांचा पक्ष झाला होता, असे त्यांनी सांगितले.
भाजपची १०५ जागांवर घसरण का झाली याचे चिंतन करुन यशाचे श्रेय घेता तशी अपयशाची जबाबदारी घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला. यश - अपयश येणार पण त्याची जबाबदारी नेतृत्वाने घ्यावी. भाजपने ओबीसी व बहुजन समाजाला विश्वास द्यावा लागेल, असे मतही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.