पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपल्या ट्विटरपंट्टी बद्दल प्रसिद्ध आहेत. चालू राजकीय घडामोंडीरवर टि्वटरवर वेचक भाष्य करण्याचे कसब असणाऱ्यांमध्ये ते अव्वल आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल लवकर नियुक्ती करत नसल्याचे पाहून राऊत यांनी `राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!,` अशा दोन वेळी आज सकाळी लिहिल्या. त्यावरून आता अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत.
राज्यपाल हे ठाकरे यांची नियुक्ती करण्यापूर्वी काही कायदेशीर बाबी तपासून घेत आहेत, अशी माहिती पुढे येत आहे. त्यावरून शिवसेना नेते अस्वस्थ आहेत. कारण राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सहा महिन्यांपूर्वीच राज्यपाल नियुक्त दोन जागांसाठीची शिफारस फेटाळली होती. राज्यपालनियुक्त जागांचा कालावधी सहा महिन्यांसाठी राहिलेला असताना आता का नियुक्त्या करता, असा सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलावडे यांच्या नियुक्त्या रखडल्या. त्याच दोन जागांपैकी एका जागेवर ठाकरे यांची नियुक्ती झाली. राज्यपाल गर्जे आणि नलावडे यांचा निकष ठाकरेंना लावणार नाही ना, अशी शंका शिवसेनेला येत आहे. त्यातूनच राऊत यांनी आधी राज्यपालांनी संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. त्यानंतर आक्रमक होऊन थेट रामलाल यांची आठवण काढली. ठाकरे यांना 26 मे पर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा धोका आहे.
रामलाल यांचे स्मरण झाल्यामुळे हे रामलाल कोण, अशा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. रामलाल हे काॅंग्रसचे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. ते 1957 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1962, 67, 77, 80 आणि 82 अशा पाच वेळा तो लोकसभेवर निवडून गेले. एवढेच नाही सुरवातीला ते 28 जानेवारी 1977 ते 30 एप्लि 1977 अशा छोट्या कालावधीसाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले आणि पुन्हा 1980 ते 1983 या कालावधीसाठी पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यांची राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशमध्ये 15 आॅगस्ट 1983 रोजी नियुक्ती झाली. त्या वेळी तेथे तेलगू देसमचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते एन. टी. रामाराव यांची सत्ता होती. रामाराव हे एक वैद्यकीय उपचारांसाठी एक आठवड्यासाठी अमेरिकेला गेले. त्या काळात रामलाल यांनी सत्तेची उलथापालथ करून टाकली. त्यासाठी अर्थात दिल्लीतील बड्या काॅंग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी हे केले होते. इंदिरा गांधी या तेव्हा पंतप्रधान होत्या.
या रामलाल यांचे स्मरण होण्यामागे राऊत यांना काही सुचवायचे आहे का, असा प्रश्न निर्णाण होतो आहे. केवळ वीस टक्के आमदारांचे बहुमत असलेला नेता संजय राऊत यांना महाराष्ट्रात दिसतो आहे का? तो काॅंग्रेसमधील आहे की राष्ट्रवादीतील की तो शिवसेनेतीलच आहे?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.