मुंबई : इंदू मिलच्या आवारात घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या निमंत्रणांवरुन राजकारण सुरु झाले आहे. खुद्द प्रकाश आंबेडकर यांना तसेच विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नव्हते. त्यावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर कुठलेही कारण न देता हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे.
'एमएमआरडीए'ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार होता. त्याचे निमंत्रण अनेक नेत्यांना नसल्याचे सकाळपासून समोर येऊ लागले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या दोघांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्यावरुन दरेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "मला आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मिळाले नाही. हे सरकार अहंकाराने भरलेले आहे. खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या काळात स्मारकाच्या कामाला गती मिळाली. हे सरकार कोणत्याही कार्यक्रमाला विरोधीपक्षाला सन्मानाने बोलवत नाही," असे दरेकर म्हणाले.
आनंदराज आंबेडकर यांनाही सकाळपर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. "मला आज सकाळी इंदू मिल मधील कार्यक्रमाची माहिती मिळाली. एमएमआरडीए आम्हला पहिल्यापासून लांब घेवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आता त्या ठिकाणी समुद्राची वाळू आणि पाणी येत आहे हे मी त्यांना दाखवून दिलं होतं. मला जरी उशिरा निमंत्रण दिले असले तरी मी सर्व राग क्रोध बाजूला ठेऊन मी या कार्यक्रमाला जाणार आहे आहे कारण मला या कामानिमित्त मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे,'' असे आंबेडकर म्हणाले होते. मात्र नंतर हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला. राज्यात अनेक प्रश्न सुरू असताना सरकारला एवढी घाई का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणावरुन वाद सुरू आहे त्यात हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "अशा कार्यक्रमांना मला इंटरेस्ट नाही. कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तरीही मला कोणावर ही आरोप करायचे नाहीत. उद्धव ठाकरेंचे आणि माझे संबंध चांगले आहेत, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत माझे संबंध कसे आहेत हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे कोणी काटा घातला असेल हे तुम्ही समजू शकता,'' असे म्हणत त्यांनी आपल्याला न बोलावण्यामागे कोण आहे हे सूचीत केले.
''माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती आहे की अटल बिहारी वाजपेयींची नोट आहे इंदू मिल च्या जागे बाबत त्याचा अभ्यास करावा. वाजपेयींना काय अपेक्षित होतं ते ठाकरेंनी बघावं व त्यासाठी पुढाकार घ्यावा. माझा स्मारकाच्या आराखड्या बाबत सुरवाती पासून आक्षेप आहे,'' असेही ते म्हणाले.
Edited By- Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.