मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत औटघटकेचे सरकार 2019 मध्ये स्थापन केले. हे सरकार अल्पजीवी ठरले. मात्र त्या सरकारविषयीच्या प्रश्नांची जंत्री फडणवीस यांचा अद्याप पिच्छा सोडत नाही. दीड वर्षांनंतरही एका मुलाखतीत त्या सरकारविषयी प्रश्न विचारण्यात आला आणि अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले हे चूक होते, याची कबुली त्यांनी एका मुलाखतीत दिली पण त्या निर्णयाचा पश्चाताप होत नाही, अशी पुस्तीही पुढे जोडली.
वाचा ही बातमी : पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी मोदींची हत्या करण्याची धमकी
एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होते, अशा शब्दांत त्यांनी चुकीची कबुली दिली. पण त्याची कारणमीमांसाही त्यांनी केली. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचे होते. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केले. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसते केलं तर चांगले झाले असते, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपले फासे तेव्हा नीट पडले नाहीत, हे देखील त्यांनी मान्य केले. काॅंग्रेस पक्ष हा कोणत्याही परिस्थितीत महाआघाडीत येणार नाही, असे वाटत होते. प्रत्यक्षात काॅंग्रेसने भूमिका बदलली आणि गणित बिघडली, असेही ते म्हणाले.
वाचा ही बातमी : लस घेतलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण शून्य
मी एक सक्षम विरोधी पक्षनेता असून माझी जबाबदारी पार पाडताना मी सरकारला प्रश्न विचारणारच, प्रसारमाध्यमं विचारत नसतील तरी मी प्रश्न विचारणार, अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा असून तो तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल, असेही त्यांनी सांगून सरकार पाडणे गैर नसल्याचे वेगळ्या शब्दांत सांगितले.