डेहराडून : हिमकडा कोसळल्याने पाण्यासह वाहून आलेल्या दगड-मातीचा लोंढा अचानक बोगद्यात घुसला. लोक बाहेर पडण्यासाठी आवाज देत होते. पण बोगद्यातील 12 कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. सर्वजण गाळात अडकून पडले. मोबाईलला नेटवर्क नसल्याने वाचण्याची शक्यता धूसर होती. पण अचानक एका कामगाराच्या मोबाईलला नेटवर्क आले अन् त्यांचा संपर्क झाला...
उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळून अलकनंदा व धौली गंगा नद्यांना महापूर आला. या दुर्घटनेत तपोवन परिसरातील ऋषिगंगा वीज प्रकल्प पुर्णपणे उध्वस्त झाला. परिसरातच दोन बोगद्यांचे काम सुरू होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे बोगद्यात काम करत असलेले मजूर तिथेच अडकून पडले. बोगद्यात गाळाच्या साम्राज्य पसरल्याने दोन्ही बोगद्यातील मजूरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी रविवारी सायंकाळी 12 जणांना एका बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. सकाळी 10 ते 5 या वेळेत त्यांना वाचविण्यात यश आले. त्यांच्यावर आयटीबीपीच्या जोशीमठ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतून वाचलेला लाल बहाद्दुर हा मजूर म्हणाला, ''बोगद्यातून बाहेर पडण्याचा आवाज आम्हाला येत होता. पण आम्ही बाहेर पडण्याआधीच अचानक पाण्याचा लोंढा बोगद्यात घुसला.'' हे मजूर बोगद्यामध्ये 300 मीटर आत अडकले होते.
"आम्हाला वाचण्याची काहीच आशा नव्हती. पण काही तासांनी आशेचा किरण दिसला. एका ठिकाणाहून उजेड दिसत होता. त्याचवेळी एकाच्या मोबाईलला नेटवर्क मिळाले. त्यावरून आमच्या व्यवस्थापकाला परिस्थितीची माहिती दिली," असे रुग्णालयातील एका मजूराने सांगितले. त्यानंतर संबंधित व्यवस्थापकाने तातडीने स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. ही माहिती मिळताच आटीबीपीच्या जवानांनी बचावकार्याला सुरूवात केली.
बोगद्यात डकलेल्या मजूरांना वाचविण्यासाटी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळपर्यंत सर्व 12 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले.
शास्त्रज्ञांकडून अभ्यास सुरू
हिमकडा कोसळण्याच्या घटनेचा अभ्यास डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अॉर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या शास्त्रज्ञांची टीम करणार आहे. ही टीम सकाळीच जोशीमठ परिसरात पोहचली आहे. हिमस्खलन आणि संबंधित घटनांचा अभ्यास करून रविवारी घडलेल्या घटनेचे कारण शोधले जाणार आहे.
चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावाजवळ रविवारी हिमकडा कोसळला. त्यामुळे अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचनाक मोठ्या प्रमाणावर वाढली. नदीव ऋषिगंगा उर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाल्याची माहिती आहे. तपोवन धरणालगत सुरू असलेल्या कामावरील सुमारे 170 मजूर वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. त्यापैकी 15 जणांना वाचविण्यात आले आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.