Keshav Upadhyay as the Chief Spokesperson of the Bharatiya Janata Party
Keshav Upadhyay as the Chief Spokesperson of the Bharatiya Janata Party  
मुख्य बातम्या मोबाईल

भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी 3 जुलै रोजी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. या मध्ये पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते तसेच माध्यम संपर्क प्रमुख केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

उपाध्ये हे गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम करीत आहेत. तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये प्रथम त्यांच्या टीममध्ये प्रवक्ते म्हणून उपाध्ये यांची नियुक्ती केली होती. अभ्यासू वृत्ती, पत्रकारितेची पार्श्वभूमी आणि पक्की वैचारीक बैठक याबरोबरच राजकीय व सामाजिक जाण यातून त्यांनी प्रवक्ते म्हणून अल्पावधीतच छाप पाडली. मराठी तसेच हिंदी, राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर अभ्यासपूर्ण शैलीत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असलेले उपाध्ये यांनी पुण्याच्या रानडे इस्ट्यिट्यूट येथून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी पुढारी, लोकसत्ता, मुंबई तरुण भारत या दैनिकात काम केले आहे. पत्रकार असल्याने केशव उपाध्ये यांनी वृत्तपत्रे, ब्लॉग, तसेच समाज माध्यमातून पक्षाची बाजू मांडणारे लेखन तसेच इतर सामाजिक आणि ललित विषयांवर देखील विपुल लेखन केले आहे 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या दोन अभ्यास गटांत त्यांचा समावेश होता. नक्षल चळवळीचा छत्तीसगडच्या विकासावर होणारा विपरित परिणाम यावर 2006 मध्ये संशोधनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केला. हा अहवाल प्रबोधिनीने प्रसिद्ध केला आहे. सोलापूर दंगलीनंतर प्रबोधिनीने पाठविलेल्या सत्यशोधन समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. 

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे रवींद्र चव्हाण यांना बळ 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बहुप्रतिक्षित कार्यकारिणीचे जंबो स्वरूप या ना त्या निमित्ताने चर्चेत असले तरी त्यात खऱ्या अर्थाने दोन महत्वाचे चेहरे ठरले आहेत, ते माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री कार्यालयातील माजी विशेष अधिकारी श्रीकांत भारतीय. अत्यंत महत्वाच्या सरचिटणीसपदी या दोघांना नेमण्यात आले आहे. 

शिवसेनेचा प्रभाव असलेल्या ठाणे परिसरात गेली दोन ते तीन वर्षे रवींद्र चव्हाण संपूर्ण ताकदीनिशी लढत भाजपचे पाय रोवत आहेत. आज या कर्तृत्वाची दखल घेत त्यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. 
श्रीकांत भारतीय हे कित्येक वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेचे काम करत. त्यानंतर ते विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघ परिवारात आले. नागपुरात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केल्यावर ते राजकारणात भाजपमध्ये आले. मिठ्ठास वाणी, दांडगा संपर्क यामुळे ते बड्या नेत्यांच्या जवळ पोहोचतात. विदर्भानंतर त्यांनी काही काळ पुण्यात काम केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT