Maharashtra cyber cell gives report on mumbai blackout
Maharashtra cyber cell gives report on mumbai blackout 
मुख्य बातम्या मोबाईल

महावितरणच्या सर्व्हरवर सायबर हल्ला... गृहमंत्र्यांनी केला धक्कादायक खुलासा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईमध्ये 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या बत्तीगुलमागे सायबर हल्ल्याची दाट शक्यता असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केले. काही काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या आयटी कंपन्यांनी मुंबईच्या इलेक्ट्रीकल सप्लायर्सच्या सर्व्हरमध्ये लॉगीन करून मालवेअर टाकण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. 

मागील वर्षी अॉक्टोबर महिन्यात संपूर्ण मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. फटका सर्वच क्षेत्राला बसला. या बत्ती गुलमागे चीनचा हात असल्याचा दावा केला जात आहे. चीनकडून सायबर हल्ला करून भारतातील वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले होते. अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेने एका अभ्यासाच्या आधारे हा दावा केला आहे. चीनमधील रेडइको या समूहाने भारतातील वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य केले होते. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणाव वाढला होता. याच कालावधीत चीनकडून या यंत्रणेत मालवेअर सोडण्यात येत होते, असा दावा करण्यात आला आहे.

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. याबाबत देशमुख व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

देशमुख म्हणाले, चौकशीचा अहवाल मिळाला आहे. त्यानुसार आठ जीबी डाटा परदेशातील अकाऊंटमधून ट्रांसफर केलेला असेल, अशी शक्यता आहे. सर्व्हरमध्ये लॉगीन करण्याचाही प्रयत्न झाला आहे. काही काळ्या यादीतील आयटी कंपन्यांनी हा प्रयत्न केल्याची शक्यता असल्याची चौकशीत समोर आले आहे. मात्र, चीनचा उल्लेख सायबर सेलच्या अहवालात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नितीन राऊत यांनी याबाबत विधानसभेत संपूर्ण माहिती दिली जाईल असे सांगितले.

अमेरिकेतील रिकॉर्डेड फ्यूचर या कंपनीकडून सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या इंटरनेटच्या वापराबाबतचा अभ्यास केला जातो. त्यांनी केलेल्या अभ्यासातून ही गंभीर बाब समोर आली आहे. भारतातील पॉवर ग्रीडला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांच्या अहवाल स्पष्ट कऱण्यात आले आहे. या काळात चीनच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच वीज पुरवठा खंडित झाला असावा, असा दावाही त्यात करण्यात आला आहे.  

दरम्यान, मागील वर्षी 12 अॉक्टोबर रोजी संपूर्ण मुंबईला वीजेअभावी मोठा फटका बसला आणि विशेषत: कोरोनाच्या कालखंडात तर हा फटका आणखी गंभीर बनला. रेल्वे, दवाखाने, पाणीपुरवठा अशा सर्वच सुविधा काही काळ ठप्प पडल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय ऊर्जाखात्याने आजच्या वीजबंदविषयी सांगितले की, मुंबईतील दोन हजार मेगावॉट वीज अचानक गायब झाली होती. राष्ट्रीय ग्रीड चांगले असून राज्याला पुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये समस्या निर्माण झाल्याने मुंबईची वीज गायब झाली होती. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT