मुंबई : राज्यात पुण्या-मुंबईसह अन्य काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील लॅाकडाऊन एक जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लॅाकडाऊनमधील सर्व निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून आज 'ब्रेक द चेन' मोहिमेची सुधारीत नियमावली आज जाहीर करण्यात आली. (Maharashtra Lockdown extended till 1 june, RTPCR compulsory to other state travellers)
देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे आता यापुढे परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच राज्यात प्रवेश दिला जाईल. ही चाचणी जास्तीत जास्त ४८ तासांपूर्वीची असायला हवी, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी १८ एप्रिल व एक मे रोजीच्या आदेशानुसार, कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या ठिकाणांहून येणाऱ्यांवर घालण्यात आलेली बंधनेही कायम राहणार आहेत.
माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये चालकासह एका व्यक्तीलाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांनाही RTPCR चाचणी रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला असून पुढील सात दिवसांसाठी तो ग्राह्य धरला जाईल. दुध संकलन, वाहतूक व प्रक्रियेवर कोणतीही बंधने राहणार नाहीत. पण त्याच्या विक्रीबाबतचे निर्बंध कायम राहतील. स्थानिक परिस्थिची आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणखी कडक निर्बंध लागू करू शकतात. त्यासाठी किमान ४८ तास आधी कळवण्याची गरज असल्याचे सुधारीत नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोना स्थितीबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री?
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, लॉकडाउनच्या संदर्भात अनेकांना अपेक्षा आहेत. लॉकडाउन केल्यानंतर सात लाखांपर्यंत रूग्ण संख्या पोहोचलेला महाराष्ट्र आता चार लाखांपर्यंत कमी झाला आहे. भारताचा प्रतिदिन वाढीचा दर दीड टक्के तर महाराष्ट्राचा प्रतिदिन वाढीचा दर ०.८ टक्के इतका आहे. या रूग्ण संख्या वाढीचा दराच्या माध्यमातून पॉझिटिव्हीटी रेटमध्ये आपण कमी झालो आहोत. आपण रूग्ण संख्या कमी होत असलेल्या राज्यांमध्ये आहोता.
देशातील ३७ राज्यात महाराष्ट्र ३० व्या क्रमांकावर आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या रूग्ण संख्येतही वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन १५ दिवस वाढवावी, अशी चर्चा मंत्रीमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे. त्यानुसार ते लवकरच निर्णय जाहीर करतील. श्री. टोपे म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना तूर्त लसीकरण केले जाणार नाही. लसीचा तुटवडा असल्याने दुसरा डोस देऊ शकत नाही. कोविड शिल्डला दीड ते दोन महिन्यात तसेच कोवॅक्सिनला एक महिन्याच्या अंतरात दुसरा डोस देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याची प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही.
महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस ४५ वयोगटाच्यावरील व्यक्तींनाच दिली जाणार आहे. २० तारखेनंतर दीड कोटी डोस देऊ असे केंद्राने सांगितले आहे. लस मिळाल्यानंतर निर्णय घेता येईल. सध्यातरी प्राधान्यक्रम ४५ वयोगटातील लोकांना दुसरा डोस देण्यावरच असेल. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे अश्यात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 16 लाख कोविशिल्ड तर चार लाख covaxin अशी 20 लाख लस बाकी आहे. सात लाख कोविशिल्ड तर चार लाख covaxin घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.