पुणे : "खासदार संजय पाटील यांना तासगाव कारखाना सुरू करण्यास आमचा विरोध नाही. कारखाना सुरू झालाच पाहिजे मात्र २८ हजार सभासद, एक हजार कामगार आणि कारखान्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे काय याचे उत्तर संजयकाकांनी द्यावे,'' असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिले आहे.
तासगाव कारखाना सभासद, कामगार आणि जमीन मालक बचाव समिती स्थापन करून ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना भेटणार आहोत, तसेच या प्रश्नी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे महेश खराडे यांनी सांगितले.
खराडे म्हणाले," दिनकरआबा पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच सभासद व अन्य घटकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहोत. ही लढाई लढताना सर्व पक्ष संघटनांना बरोबर घेणार आहोत. हा कारखाना उभा करताना सभासदांनी शेळ्या मेंढ्या, जनावरे विकून कुणी बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवून तर कुणी जमिनीवर कर्जे काढून शेअर विकत घेतले आहेत. त्या सभासदांचे अस्तित्व काय, हा प्रश्न आहे. त्याच बरोबर अनेक कामगारांनी कारखाना उभा करण्यासाठी पदर मोड करून उभे तारुण्य खर्ची घातले आहे. त्यातील किती कामगारांना परत कामावर घेतले आहे, याचे उत्तर संजय पाटील यांनी द्यायला हवे.
तासगाव तालुक्यात साखर कारखाना उभा करण्याचे धाडस दिनकरआबा पाटील यांनी केले. त्यावेळी तुरची येथील दलित
शेतकऱ्यांनी स्वतः भूमिहीन होवून कारखान्यासाठी जमिनी दिल्या होत्या त्यांचे काय? त्यावेळी प्रत्येकाच्या मुलाला कामावर घेतो असे सांगितले होते. आता तरी संजय दलीत शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देणार आहेत का? हा आमचा खडा सवाल आहे, असे खराडे यांनी म्हटले आहे.
"कारखान्याच्या परिसरात येळावी, तुरची निमणी यासह परिसरातील गावांत द्राक्ष बागेचे मोठे क्षेत्र आहे. कारखान्याच्या धुराडीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे द्राक्ष बागा संकटात येणार आहेत. त्यामुळे त्या बागांचे नुकसान होवू नये यासाठी काय प्रयोजन केले आहे. याचे उत्तर संजयकाकांनी द्यावे,"असे खराडे म्हणाले.
"राज्य सहकारी बँकेने शंभर ते सव्वाशे कोटीची मालमत्ता असलेला कारखाना ३४ कोटींना कसा विकला, हा प्रश्न आहे. त्याला जिल्हा बँकेने कशी मान्यता दिली याचेही उत्तर मिळत नाही. कारखान्याची जमीनच १५० एकर आहे. आता तेथून राष्ट्रीय महामार्ग जातोय. जमिनीचे मूल्यांकन वाढले आहे मग जुन्याच मूल्यांकनावर राज्य बँकेने हा कारखाना गणपती अग्रो प्रा. लि. ला कसा दिला हा आमचा प्रश्न आहे. जाहीर बोली का लावली नाही? गुपचूप विक्री का करण्यात आली? असे अनेक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न घेवून आम्ही शेतकऱ्या पर्यंत जावू, असे खराडे म्हणाले.
Edited by swarup jankar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.