Many BJP corporators in Pimpri are in touch with me : Ajit Pawar
Many BJP corporators in Pimpri are in touch with me : Ajit Pawar  
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात : एकगठ्ठा प्रवेशाचे अजितदादांचे संकेत  

उत्तम कुटे

पिंपरी  ः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. परंतू पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना (इलेक्टीव्ह मेरीट) आणि आपले कार्यकर्ते तथा संभाव्य उमेदवारापेक्षा ताकदवान असणाऱ्यांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. १७ सप्टेंबर) पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. (Many BJP corporators in Pimpri are in touch with me : Ajit Pawar)

सरसकट सर्वांना पक्षात घेतले जाणार नसल्याचेच अजित पवार यांनी सूचित केले. दरम्यान, त्यांचे हे विधान २०२२ मध्ये शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा केलेल्या भाजपची चिंता वाढविणारे ठरले आहे. सध्या भाजपचे ७७ नगरसेवक आहेत.

भाजपचे नगरसेवक घेण्यापूर्वी ते अपात्र ठरणार नाहीत ना, याची काळजी घेतली जाणार असल्याचे अजित पवारांनी दादांनीसांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी वरील गौप्यस्फोट केला. पिंपरी महापालिकेतील भाजपशी संलग्न अपक्ष नगरसेवकांच्या आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. माया बारणे व चंदा लोखंडे या भाजप नगरसेविकांचे पती अनुक्रमे संतोष बारणे आणि राजू लोखंडे हेसुद्धा राष्ट्रवादीत आले आहेत. 

या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत का, अशी विचारणा केली असता उपमुख्यमंत्री पवार यांनी इलेक्टीव्ह मेरीट असलेल्यांना ताकदवान नगरसेवकांना प्राधान्य राहणार असल्याचे सांगितले. कारण, मॅजिक फिगर गाठण्यासाठी ते करावेच लागते, असेही ते म्हणाले. राज्यात ज्याच्याकडे १४५ हा जादूई आकडा आमदारांचा असतो, त्यांची सत्ता येते. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे बहुमतासाठी नगरसेवक घेताना ते अपात्र ठरणार नाहीत, हे पाहिले जाईल. म्हणजेच भाजप नगरसेवकांची राष्ट्रवादीमधील घरवापसी ही एकटेदुकटे नसून ती एकगठ्ठाच असेल, असेही त्यांनी सूचित केले. 

भाजपच्या अनेक नगरसेवकांना ते राष्ट्रवादीत असताना मी विविध पदावर संधी दिली, तरीही ते २०१७ मध्ये भाजपमध्ये गेले. पंतप्रधान मोदींची मोठी हवा त्यावेळी होती. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार होते. त्याचा त्यांना फायदा झाला. परिणामी अनेक विकासकामे करूनही आम्हाला पिंपरी महापालिकेत विरोधी पक्षात बसावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी करण्यात आलेल्याा चारच्या प्रभाग पद्धतीचाही फटका बसला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कारण ती करताना आम्हाला ती त्रासदायक होईल, असे खालच्या पातळीवरचे राजकारण खेळण्यात आले. ते मी कधी केले नाही वा यापुढेही करणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT