मुख्य बातम्या मोबाईल

खासदार हेमंत पाटलांच्या मतदारसंघात सर्वाधिक 38 तर; भास्कर जाधवांकडे फक्त तीन उमेदवार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदूर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

शनिवारी झालेल्या छाननीअंती 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 68 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 109 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 42 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 38 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 135उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तर, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 33 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 53 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 79 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 128 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 148 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 53 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 214 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात 244 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 89 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 78 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 246 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 116 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 115 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 79, उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 50 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 73 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 32 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 23 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 68 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.

सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिण मध्ये तर सर्वात कमी चिपळूण मतदारसंघात

सर्वात कमी 3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील या निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात मोहन हंबर्डे येथे निवडणूक लढवित आहेत. चिपळूण मतदारसंघात शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्यात प्रमुख लढत होत आहे.)

नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे.

अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात 11 कोटी 39 लाख रुपयांची रोकड, 12 कोटी 47 लाख रुपयांची दारु, 15 कोटी 29 लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि 8 कोटी 87 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे 48 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

राज्यात विविध कलमांखाली 442 प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये भा.दं.वि.अंतर्गत विविध कलमांखाली 102, लोक प्रतिनिधीत्व अधिनियमाखाली 15, अंमली पदार्थ विषयक एनपीडीएस अधिनियमांतर्गत 72, मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत 228 तर मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत 25 प्रकरणांचा समावेश आहे, अशीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

राज्यात मतदार नोंदणी तसेच मतदार यादी अचूक होण्याच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रारूप मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या मतदार याद्यातील त्रुटी दाखवून देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मदत करण्यास राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 1 लाख 10 हजार बीएलए नेमण्यात आले होते. या बीएलएच्या साहाय्याने मतदार यादी जास्तीत जास्त अचूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT