नाशिक : उत्तर प्रदेशातील ८३९ नागरीकांना घेऊन काल येथून दुसरी रेल्वेगाडी रवाना झाली. गेले दीड महिना सर्व यंत्रणा हे मजूर व त्यांच्या मुलाबाळांसाठी झटत होती. त्यामुळे रेल्वे सुटतांना आपल्या गावी पोहोचणार या भावनेने त्यांच्या डोळ्यात चमक होती. गाडी सुटतांना या प्रवाशांनी 'महाराष्ट्र सरकार की जय'...'जय महाराष्ट्र' या घोषणा देत प्रशासनाला धन्यवाद दिले.
नाशिक शहरातील विविध निवारागृहात गेल्या दीड महिन्यापासून थांबून असलेल्या उत्तर प्रदेश येथील कामगार, मजुरांना शनिवारी सकाळी विशेष रेल्वेने लखनऊला रवाना करण्यात आले. यामध्ये मुंबई, नालासोपारा, कल्याण, नेरूळ येथील मजूर होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. निरोप देताना पालकमंत्री देखील भावूक झाले होते. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरांतून पायी उत्तर प्रदेशकडे निघालेल्या या मजुरांना इगतपुरी, नाशिक येथे थांबवून निवारागृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व मजुरांना आज विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, ''मुंबई येथून पायी चालत आलेल्या या परप्रांतीय मजुर लॉकडाउन होताच पायी गावाकडे निघाले होते. त्यांना नाशिक आणि इगतपुरी येथील निवारागृहात थांबवून तेथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था, आरोग्य तपासणी, मुलांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये जे कोरोना संशयित वाटत होते, त्यांना थांबविण्यात आले आहे. उर्वरितांना विशेष रेल्वेने सोडण्यात आले. गाडीतही त्यांना सुरक्षित अंतर ठेवत बसविण्यात आले आहे. सोबत दोन वेळेचे जेवण, पिण्याचे पुरेसे पाणी देण्यात आले आहे.'' जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आरोग्य यंत्रणा यांनी या परप्रांतीय मजुरांची काळजी घेतली, अशा शब्दात पालकमंत्री श्री भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.
या सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे रेल्वे सुटली तेव्हा त्यांनी मोठमोठयाने महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. आपण अपेक्षा करू हा कोरोना लवकरच महाराष्ट्रातून, भारतातून आणि संपूर्ण जगातून नाहीसा होईल, अशी आशा पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.