मुंबई : "कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.. कायदेशीर कारवाई केली आहे, नाईक यांच्या कुटुंबियांकडून माझ्याकडे तक्रार आलेली होती, कोर्टाच्या परवानगीनं ही केस ओपन झाली आहे," असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर अनिल देशमुख पत्रकारांशी बोलत होते.
"केवळ सुडाच्या भावनेने ही केस पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे," असा आरोप भाजपने केला. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी बोलत होते. इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत.
अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येत नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणाची केस 2018 मध्येच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे," असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे.
"महाराष्ट्र सरकार सुडभावनेनं काम करीत नाही, पोलिसांकडे पुरावे असतील तर कुणावरही कारवाई करू शकतात, " असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. "महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही, पोलिसाकडे सबळ पुरावे असल्याशिवाय ते कुणालाही अटक करीत नाहीत," असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. खासदार संजय राऊत म्हणाले, "अभिनेता सुशांतसिह प्रकरणात राज्य सरकारवर अर्णब गोस्वामी यांनी आरोप केले आहेत, याबाबतही चैाकशी व्हायला पाहिजे. या राज्यात कोणी चुकीचं काम करीत असेल, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत असते, मग ते पत्रकार, अभिनेता, वकील कुणीही का असो. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जे चुकीचं काम करतील त्यांच्यावर कारवाई होणारच"
अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.