nsa ajit doval held talks with chinese foreign minister over video call
nsa ajit doval held talks with chinese foreign minister over video call 
मुख्य बातम्या मोबाईल

अजित डोवालांचा थेट चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना व्हिडीओ कॉल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गल्वान खोऱ्यातून चीनने अखेर आपले लष्कर मागे घेण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार चीनने आज कार्यवाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी थेट चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी  व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून चर्चा केल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांनी परस्परसामंजस्याने तोडगा काढण्याची तयारी आता दर्शविली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी काल व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली. दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे आणि शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. भविष्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या घटनेसारखे प्रकार टाळण्यावरही चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांनी शांतता प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यावर सहमती दर्शविली आहे. 

भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जूनला रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला नव्हता. 

भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना घडली होती. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले आहेत. या आधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. भारतीय लष्कराने चीनच्या बाजूचे सैनिकही मारले गेल्याचा दावा केला असून, त्यांची संख्या आताच सांगणे शक्य होणार नाही, असे म्हटले होते. 

मागील काही काळापासून पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्य आमनेसामने आले असून, दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांनी संघर्ष टाळून माघार घेतल्याचा दावा नुकताच केला होता. आता ही घटना घडल्याने त्यांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पूर्व लडाखमध्ये पँगाँग त्सो, गल्वान खोरे, डेमचॉक आणि दौलत बेग ओल्डी या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान याआधी संघर्ष झाला आहे. मात्र, यात कोणतीही जिवितहानी झालेली नव्हती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT