मुंबई : शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. दरम्यान, विधान परिषदेत विरोधी पक्षांनी आक्रमक होत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधानपरिषदेचे कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधित यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे.
चर्चा होऊन दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
दरम्यान, विधान परिषदेतही विरोधी पक्षांनी या मुद्दयावरुन सरकारला धारेवर धरले, "ऊर्जामंत्र्यांनी शब्द दिला होता वीज माफी संदर्भात त्या शब्दाच काय झाल? वीज बिल माफ करण्यात आलं पाहीजे.सरकारने आज शब्द दिला पाहीजे. लाखो जणांच वीज कनेक्शन कट केली जात आहेत. ते थांबवण्यात आलं पाहीजे,'' अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. याबाबत विरोधी पक्षाने वीज बिला संदर्भात जी भूमिका घेतली आहे त्याची आम्ही नोंद घेतली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.