मुख्य बातम्या मोबाईल

परप्रांतातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या : संजय निरुपम 

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः मुंबईत तीन पिढ्या वास्तव्यास असलेल्या परराज्यांतील ओबीसी समुदायाला आरक्षण लागू करा, या मागणीसाठी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

मुंबई कॉंग्रेसमध्ये "निरूपम हटाव' मोहीम सुरू असतानाच ही भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. या विषयासंबंधी निरूपम यांनी गेल्या आठवड्यातच वेळ मागितली होती. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयाने भेटीची वेळ कळवल्याचा दावा निरूपम यांचे समर्थक करीत आहेत. 

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरयाणा अशा विविध राज्यांतले ओबीसी समाज मुंबईत तीन पिढ्यांपासून व्यवसायासाठी राहतात. त्यांच्या राज्यांत त्यांच्या जातींना आरक्षण मिळते; मात्र महाराष्ट्रात ते लागू होत नाही. याविषयी तोडगा काढा, अशी मागणी निरूपम यांनी केली. "ही मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली आहे. या विषयात लक्ष घालून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी लगोलग निर्देशही दिले आहेत', असे निरूपम समर्थकांकडून सांगण्यात आले. 

"राहुल गांधींनाच अधिकार' 
निरूपम यांच्या विरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीचा विषय पुढे आला आहे. त्यावर निरूपम यांनी, "कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मला मुंबई विभागीय कॉंग्रेसचा अध्यक्ष केले आहे. माझ्या पदाचा तसेच माझ्या कामगिरीचा लेखाजोखा ठेवून त्यानुसार निर्णय घेण्याचे अधिकार केवळ त्यांना आहेत', असे सांगून या विषयावर बोलणे टाळले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT