Over Hundred Workers of ST Affected by Corona
Over Hundred Workers of ST Affected by Corona 
मुख्य बातम्या मोबाईल

एसटीच्या ११४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; मुंबई विभागाला सर्वाधिक फटका

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या  (एसटी) एकूण ११४ कर्मचाऱ्यांना  शनिवार (ता.४) पर्यंत राज्यात कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई विभागातील ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंतचा एसटी महामंडळातील हा आकडा सर्वाधिक आहे. ठाणे विभागात ३० कर्मचारी बाधित असून २ कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी अधिकृत माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

राज्य शासनाने एसटी आणि बेस्टवर मुंबई उपनगरातील अत्यावश्‍यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रवासी सेवा देण्याची जबाबदारी दिली होती. मुंबई, ठाणे, पालघर विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्‍यक सेवा देण्यासाठी मुंबईत कामावर येणाच्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या, मात्र प्रवासी सेवा देताना महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना केली गेली नाही. त्यातून अखेर एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

ठाणे, पुणे, सोलापूरमध्येही कर्मचाऱ्यांना बाधा

मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना कोरोनाबांधित कर्मचाऱ्यांची आकडेवारी नुकतीच मागितली होती. त्यातून राज्यात एसटीचे ११४ कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांना बाधा झाली असून, त्यानंतर ठाणे, पुणे, सोलापूर येथेही कोरोनाबाधित एसटी कर्मचारी सापडले आहे.

मात्र, या बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी किंवा त्यांच्यापासून इतर कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये, यासाठी एसटीच्या मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महामंडळातील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या अजूनही वाढण्याची शक्‍यता आहे.

आकडे लपवले जाताहेत?

ठाणे विभागात कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची आकडेवारी सर्वाधिक आहे. मात्र ही आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटनेने केला आहे.

५० लाख रुपयांच्या मदतीवरही प्रश्‍नचिन्ह

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तत्कालीन अधिकारी माधव काळे यांनी आपली कंत्राटी पदाची मुदत संपल्यानंतरही १ जून रोजी अनधिकृत परिपत्रक काढून ५० लाखांचा लाभ देण्यासंदर्भात राज्यातील विभाग नियंत्रकांना सूचना केल्या होत्या. हे परिपत्रकच चुकीचे असल्याचा आरोप राज्य एसटी वर्कर्स कॉंग्रेस इंटकने केला होता. मात्र, अद्याप सुधारित परिपत्रक निघालेले नाही. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५0 लाखांचा आर्थिक लाभ नक्की मिळेल की नाही, यावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT