नवी दिल्ली : दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा 1 ते 15 जुलै या कालावधीत होणार आहेत, असे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने म्हटले आहे.
याआधी सीबीएसईकडून 3 हजार केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जात. मात्र, या वेळी देशभरात तब्बल 15 हजार परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी काही अटींवर नुकतीच परवानगी दिली होती. गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना या निर्णयाची माहिती कळविली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, मोठ्या संख्येने असलेल्या दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत काही अटींवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्याला मास्क लावणे, थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझरचा वापर आदी. अटींचा समावेश आहे. या अटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत.
गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला म्हणाले होते की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी शाळांवरील निर्बंध काही काळ उठविण्यात आले आहेत. राज्य शिक्षण मंडळे, सीबीएसई, आयसीएसईकडून होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा लॉकडाउनमुळे शाळा बंद करण्यात आल्याने स्थगित करण्यात आल्या होत्या.
या परीक्षा घेण्यासाठी अनेक राज्ये आणि सीबीएसईने केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यावर अखेर गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. मात्र, बाधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) कोणतेही परीक्षा केंद्र असणार नाही आणि विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
वेगवेगळ्या बोर्डांकडून परीक्षा घेण्यात येणार असल्या तरी यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी बस उपलब्ध करुन द्याव्यात. या बसमधून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची वाहतून करण्यात यावी, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
देशातील लॉकडाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरूवातीला २४ मार्चपासून २१ दिवसांसाठी जाहीर केले. त्यानंतर ते ३ मेपर्यंत आणि पुन्हा १७ मेपर्यंत वाढविण्यात आले. आता हे लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.