Petrol_
Petrol_ 
मुख्य बातम्या मोबाईल

पेट्रोलचा 'भडका'आणखी वाढणार...

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या अठरा दिवसात पेट्रोल व डिझलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एक जूनपासून पेट्रोल आठ रूपये ८५ पैसे तर डिझल नऊ रूपये १५ पैशांनी वाढले आहे. कोरोनाच्या काळात विविध देशात सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ शिथिल होत असल्याने आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात वाढ होत आहे. परिणामी इंधनाच्या दरात रोज वाढ होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. आणखी काही दिवस ही वाढ कायम राहील. पेट्रोलचा दर आणखी दोन रूपयांपर्यंत वाढू शकतो, असेही या तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या अठरा दिवसात इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटाने त्रस्त असलेल्या सामान्यांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसला आहे.  इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याने महागाई वाढण्याची भीती आहे. रोजगाराची साधने बंद आहेत. अशातच महागाई वाढली तर काय करायचे हा सामान्यांपुढील प्रश्‍न आहे. इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. येत्या काळात दरात आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात असल्याने अधिकच गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन डॉलर ७६ रूपयांपर्यंत वाढला आहे तर कच्च्या तेलाचा भाव ४६ रूपये बॅलर झाल्याने दरात वाढ होत आहे. या संदर्भात बोलताना ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसि्यशनचे प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, ‘‘ इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याने महागाई वाढू शकते. मुळात इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरावर ठरविण्यात येतात. देशांतर्गत मागणी किंवा बाजाराशी याचा काहीही संबंध येत नाही. वाढणाऱ्या दरावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तेल कंपन्या सरकारी मालकीच्या असल्या तरी कंपनी म्हणून त्यांना स्वतंत्र आधिकार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या कंपन्या रोजचा दर निश्‍चित करून पेट्रोल पंप चालकांना कळवत असतात. यावर सरकारचे थेट कोणतेही नियंत्रण नसते.’’

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी झाल्यानंतर तेल कंपन्या दर का कमी करीत नाहीत हा प्रमुख आक्षेप नेहमी घेतला जातो. मात्र, आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे असलेले विविध कर तसेच कंपन्यांच्या नफ्या-तोट्याचा विषय येत असतो. परिणामी कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले तरी विक्रीचा दर कमी करीत नाही. सरकारी कर गृहीत धरूनदेखील अनेकवेळा आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यानंतरही तेलावरील प्रक्रिया आणि इतर खर्चामुळे कंपन्यांना तोटा झालेला असतो. हा तोटा अशावेळी भरून काढला जातो. त्यामुळे बऱ्याचवेळा आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होऊनदेखील कंपनी दर कमी करीत नाहीत, असे या क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT