1Sarkarnama_20Banner_20_202021_03_26T104714.597.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

IPS रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनी बजावले समन्स..उद्या जबाब नोंदविणार...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.  फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता.

या प्रकरणी आता रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनीच समन्स पाठवले  आहे.  एएनआयने ही माहिती दिली आहे. या प्रकरणातील तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. रश्मी शुक्ला यांना बुधवारी उपस्थित राहण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.  २०१९ च्या फोन टॅपिंग प्रकरणाबाबत हे समन्स बजावण्यात आले आहे. 

रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत. हैदराबाद येथे त्या कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मुंबईतील सायबर पोलिस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. शुक्ला या उद्या (ता.२८) आपला जबाब नोंदविणार आहेत.

"वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी काम करणारे एक रॅकेट मंत्र्यांचे नाव वापरते आहे. बदल्यांबाबत पोलिसांबरोबर थेट बोलणे होत आहे, अशी माहिती शुक्ला यांना मिळाली होती. कॅाल रेकॅार्डिंग सुरु झाले त्यावेळी स्फोटक माहिती समोर आली. या साऱ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल शुक्ला यांनी २५ अॅागस्ट २०२० रोजी महासंचालकांना दिला," असे फडणवीस म्हणाले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगेच पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पलटवार केला होता, गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री थेट कोणत्याही बदल्या करत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र मंडळ असते. त्यामुळे फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. शुक्ला यांच्या अहवालात आरोप करण्यात आलेल्या ८० टक्के बदल्या झाल्या नाहीत. शुक्ला यांनी खोटा अहवाल तयार केला.

फोन टॅपिंगसाठी त्यांनी कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. त्यांनी महाराष्ट्रात सरकार बनविण्याचे संकट असताना त्यांनी सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. भाजपच्या एजंट म्हणून काम करताना त्यांना फोन टॅपिंगची सवय झाली होती. त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून इतर पदावर नियुक्ती करण्यात आली. दिल्लीत गेले दोन अधिकारी त्याकाळात भाजपसाठी काम करत होते, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT