पुणे : गांधी घराण्याला कोणत्याही पदाची लालसा नसल्याने या घराण्याला जनमाणसांमध्ये स्थान आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षापदावरून विरोधक वेगवेगळ्या वावड्या उठवत आहेत. पण, सोनिया गांधींनी पंतप्रधानपद सोडलं. तिथं त्यांच्यासमोर पक्षाचे अध्यक्षपद काय आहे. पण, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना सोडून कोणाकडे अध्यक्षपद देणार, हा पक्षासमोर प्रश्न आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी सांगितले.
प्रियांका गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद गांधी घराण्याऐवजी इतरांकडे सोपवावे, असे म्हटले होते. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उल्हास पवार "सरकारनामा'शी बोलत होते.
कॉंग्रेसने राज्यात आणि देशात अनेक वर्षे लोकाभिमुख सत्ता चालवली. पण, देशातील व राज्यातील कॉंग्रेसच्या विद्यमान नेत्यांनी स्वार्थापोटी संघटना वाढविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज कॉंग्रेसची जी अवस्था झाली आहे, ती पाहून मन अक्षरशः तुटते, असे अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, "देशभर कॉंग्रेसची पीछेहाट झाली असताना, पक्ष संघटनेकडे कोणत्याही नेत्याचे लक्ष नाही. पक्षात उदासिनता पसरली आहे. यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात. अपयश आले म्हणून खचण्याचं काही कारण नाही. रस्त्यावर उतरून अहोरात्र मेहनत घेत पक्ष वाढविला पाहिजे, पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही.'
"मी 1980 च्या दशकात ज्या वेळी युवक कॉंग्रेसमध्ये काम करायचो, त्या वेळी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला होता. संघटना ही आमची आत्मा होती. माझेही संजय गांधी, राजीव गांधी यांच्याबरोबर जवळचे संबंध होते. मी ठरवले असते, तर मला सहज मंत्रिपद मिळाले असते. पण, मी इतरांना मंत्री करण्यात धन्यता मानली आणि स्वतः पक्ष वाढीसाठी झटलो. पद मिळाले नाही म्हणून कधीच रुसून बसलो नाही. कॉंग्रेसमधील सध्याचे नेते हे पद मिळाले नाही की पक्ष सोडतात, असा टोलाही त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लगावला.
राज्यात तर कॉंग्रेसला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पडतो. महाविकास आघाडीत पक्ष सामील असला तरी संघटनेकडे कोणत्याही मंत्र्याचं आणि नेत्याचं लक्ष नाही. पुणे शहर एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला होता. पण, शहरातील पक्ष संघटनेकडे कोणी लक्ष दिले नाही. नाही त्या नेत्यांना पदे मिळाल्याने शहरात आज कॉंग्रेसची वाईट अवस्था झाली आहे. पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या तरुण नेत्याची या पक्षाला गरज आहे, असे उल्हास पवार म्हणाले.
कॉंग्रेस हा विचार असून या पक्षाला कोणीही संपवू शकत नाही. संपवतो म्हणणारे संपले. पण, त्यासाठी नेटाने लढले पाहिजे. भाजप आज ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे देशात त्यांच्याविरुद्ध प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीबद्दल जनेत जागृती करणारा नेताच कॉंग्रेसकडे उरला नाही, तर लोक आपल्याला कसे मतदान करतील, असे मत पवार यांनी मत व्यक्त केले.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.