मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात जसा संजय राठोड यांनी राजीनामा दिला, तसा धनंजय मुंडे यांनीही दिला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यामुळे भाजपची जी भूमिका तीच माझी भूमिका असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला आपण पुरोगामी म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणे नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत, ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जात आहे, असे म्हणात पंकजा यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला, पण या प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली. पूजा चव्हाण प्रकरणात जे खरे आहे ते समोर आले पाहिजे. समाजाला कोणाच्याही बाजूने उभे राहण्याची गरज नाही. तपास यंत्रणा काय तो निर्णय घेईल. कोणत्याही प्रकरणात आधीच कोणाला दोषी किंवा निर्दोष समजणे चुकीचे आहे, तो निर्णय तपास यंत्रणांवर सोडावा, असे आवाहनही पंकजा यांनी केले.
पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणे आणि वेगाने तपास करणे आवश्यक असल्याचे म्हणत जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य आणि अपेक्षित त्या मार्गाने होण्याची गरज आहे. सोबतच याप्रकरणी पूजा चव्हाणची ओळख जाहीरपणे सर्वांसमोर आणली गेल्याबाबतही त्यांनी मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोनाच्या काळामध्ये मी लोकांना आवाहन केले होते की, कोरोना असल्यामुळे मी फक्त दर्शनासाठी भगवान गडावर जाणार आहे. आॅनलाईन कार्यक्रम घेणार आहे. लोकांना गडावर येवू नये असे सांगितले असतानाही काही लोक गडावर आले आणि माझ्यावर दहा मिनिटांत गुन्हा दाखल झाला. मात्र, अनेक लोकांचे मोठे-मोठे सत्कार होत आहेत. अनेकांवर जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळला जात आहे. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावला.
आम्ही चुकीचे असलो तरी आमच्या सोबत समाज आहे, अशी प्रथा पाडू नये. धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्या अशा प्रकरणांमुळे महाराष्ट्राची इतर राज्यात बदनामी होत आहे. चित्रा वाघ यांची बदनामी करणे चुकीचे आहे. त्यांनी भूमिका मांडली. त्यांचे फोटो व्हायरल करणे चुकीचे आहे. राजकारण करताना विरोधी पक्षात राहिले, मला त्यावेळी असुरक्षित वाट नव्हते. पण, गेल्या काही दिवसांपासून मला भीती वाटायला लागली आहे. राजकारणात असुरक्षित वाटायला लागले आहे, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
Edited By-Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.