मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. आठवलेंची सुरक्षा पूर्ववत करण्याची मागणी केली.
मागील महिन्यात झालेल्या रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख ऐकीकडे काव्यमय शुभेच्छा देतात, तर दुसरीकडे तेच गृहमंत्री देशमुख आठवलेंच्या सुरक्षेत कपात करतात, हे कसं काय जमतं तुम्हाला? असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी गृहमंत्री देशमुख यांना विचारला.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, रमेश गायकवाड, चंद्रशेखर कांबळे, सचिन बनसोडे, रश्मी यादव आदी उपस्थित होते.
दरम्यान, आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्याच्या निषेधार्थ आज राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्य सरकारविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.
आठवले यांची सुरक्षा दोन दिवसांत पूर्ववत करण्यात आली नाही तर येत्या ता. 17 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिला.
आठवले यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा राजकीय द्वेष भावनेतून आणि कोत्या मनोवृत्तीतून घेण्यात आलेला निर्णय आहे. त्याबाबत फेरविचार करण्याचे राज्य सरकारला निर्देश द्यावेत, या मागणीसाठी लवकरच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे कळविण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.