Fadanvis--Sadanand--More
Fadanvis--Sadanand--More 
मुख्य बातम्या मोबाईल

असंतोष दूर करण्याची गरज ,नोकरशाहीने करावे साह्य - प्रा.सदानंद मोरेंचे आवाहन

मृणालिनी नानिवडेकर / सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : " महाराष्ट्रात निर्माण झालेली अस्वस्थता मार्गी लावण्यासाठी नोकरशाहीने सकारात्मक होण्याची गरज आहे ," अशी अपेक्षा   सारथी मार्गदर्शन  समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा. सदानंद मोरे यांनी  व्यक्‍त केली आहे . 

मराठा समाजातील विदयार्थी तसेच तरूणांची अस्वस्थता विधायक मार्गाने सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेला सारथी मार्गदर्शन समितीबददलचा जीआर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात आला . 

या पार्श्वभूमीवर  बोलताना  प्रा. सदानंद मोरे म्हणाले, " महाराष्ट्रात शेतीक्षेत्रात नापिकीमुळे तसेच अनेक तदनुषंगिक कारणांमुळे असंतोष निर्माण झाला आहे.त्याची सोडवणूक करण्यासाठी अवाढव्य सरकारी यंत्रणेने प्राधान्याने काही विषय सोडवणे आवश्‍यक आहे.यासंदर्भात जे निर्णय घेतले जात आहेत ,ते महत्वाचे आहेत. ते प्रत्यक्षात यावेत यासाठी नोकरशाहीने गतीमान होणे आवश्‍यक आहे." 


प्रा. सदानंद मोरे  पुढे म्हणाले ," महाराष्ट्रातील मराठा ,कुणबी आणि शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक विकासावर लक्ष देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तरूणांना आगामी शैक्षणिक सत्रापासून वसतीगृहे मिळावीत तसेच त्यांच्या शिक्षण व रोजगारात निर्माण होणारे प्रश्‍न तातडीने सोडवले जावेत यासाठी सारथीने काम करणे अपेक्षित आहे." 

"भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ स्थापन करण्यात आलेल्या बार्टी या संस्थेच्या धर्तीवर ही संस्था काम करणार आहे.मात्र नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास केवळ काही महिन्यांचा कालावधी उरला असताना या संस्थेची स्थापना अदयाप प्रलंबित आहे.संस्थेचे काम ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या मार्गदर्शन समितीची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा कालावधीत वाढ करण्यासाठी आता नव्याने शासननिर्णय जारी करण्यात आला आहे." असेही  प्रा. मोरे यांनी सांगितले . 

समितीचे सदस्य प्रशांत पवार  म्हणाले ," आगामी वर्षात अधिकाधिक युवकांना सारथीचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे .  आगामी काळात सर्व गरजू विदयार्थ्याना निवासाची जागा उपलब्ध करून देणे तसेच शैक्षणिक शुल्काचा लाभ मिळवून देणे हा आमचा प्राधान्यक्रम असेल .त्यासाठी लवकरच अध्यक्ष मोरेसरांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करु.एकही विदयार्थी निवासव्यवस्थेपासून वंचित राहू नये अशी आमची  अपेक्षा आहे . "

संस्थेची कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अतंर्गत नोंदणी करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे कामे गतीने करता येतात.मात्र प्रत्यक्षात हा निर्णय कागदावर येण्यासाठीच उशीर झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील या विषयासंदभांत अत्यंत आग्रही असतानाही हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी कालावधी लागला.  त्यामुळेच या समितीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रा.सदानंद मोरे यांनी वेगाची अपेक्षा व्यक्‍त केली आहे असे दिसते  . 

एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत , निवृत्त सनदी  अधिकारी ऊमाकांत दांगट , पी.डी.करंदीकर , डी.आर.परिहार ,सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि  प्रशांत पवार यांची या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT