मुंबई : राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) माहिती आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी म्हटले होते. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला ते म्हणाले, ''अजित पवार यांना चांगले माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनले, दुपारी कोसळले, त्यानंतर पुन्हा ते बनले…या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत'', असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
राऊत यांनी आज मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता. महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे. एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य, असल्याचे राऊत यांनी सांगितले.
इथे मतभेद असले तरी चालतील मात्र तिथे असायला नकोत. प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेले पाहिजे. तिथे लोकांचा उत्स्फुर्तपणे पाठिंबा मिळतोय. यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेकळे चांगली मुसंडी मारतील, असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केला. 'सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणे हे राज्यातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. आम्ही सर्वांना आवाहन केले होते बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या, असे राऊत म्हणाले.
बेळगावसाठी १९६७ साठी आंदोलन करून शिवसेनेने ६७ हुतात्मे दिलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, असे राऊत म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.