मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात श्रीरामांचा जयघोष झाल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाषण थांबवले होते. यावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचाही श्रीरामावर विश्वास असेल, अशी प्रतिक्रिया दिली. देशात कुणालाही जय श्रीरामच्या जयघोषाने त्रास होता कामा नये. या घोषणांनी कुणाच्याही धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होणार नाही, असा टोलाही त्यांनी ममता दीदींना लगावला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंतीनिमित्त काल (ता.23) पश्चिम बंगालध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. त्या बोलत असताना उपस्थितांमधून जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्याने त्यांनी संतापून भाषण केले नाही. त्यांच्या या नाराजीनाट्यावर भाजपाकडून टीका करण्यात आली. तर तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनीही या संपू्र्ण प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नव्हे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या या कृतीवर बोलताना राऊत म्हणाले, देशामध्ये जय श्रीरामाच्या घोषणेने कुणालाही त्रास होऊ नये. जय श्रीराम हा राजकीय शब्द नाही. हा विश्वासाचा भाग आहे. आणि मला खात्री आहे की, ममता दीदी यांचाही त्यावर विश्वास असेल. जय श्रीराम म्हणून कोणाच्याही धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होणार नाही.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्येही ममता बॅनजी यांनी नाराजी व्यक्त करायला नको होती, असे म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांचा वीक पॉइंट बंगाल भाजपने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक वियांवर मर्मभेद करीत राहतील. जय श्रीरामच्या नाऱ्यांवर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता, पण प्रत्येक जण आपल्या व्होट बँकेचीच पखाली वाहत असतो, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.
दरम्यान, व्हिक्टोरिया मेमोरियल कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले. परंतु, दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले होते. ममता दीदी या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, त्या त्यांचे नाव घेताच गर्दीतून जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे त्या संतापल्या होत्या.
त्या म्हणाल्या होत्या की, हा राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमात शिष्टाचाराचे पालन व्हायला हवे. कोलकत्यात हा कार्यक्रम घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे मी आभार मानते. पण एखाद्याला व्यासपीठावर बोलावून त्याचा अपमान करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत मी आणखी काही जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला, असे म्हणत त्यांनी भाषण थांबविले होते.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.