नवी दिल्ली : देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी कोव्हॅक्सिन लस घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आज लस घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनाही उद्यापासून लस दिली जाणार आहे. पण त्यांना लस कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस निवडण्याचे स्वातंत्र्य नसेल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आजपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. हे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. आता दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.
या टप्प्यात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनाही उद्यापासून लस दिली जाणार आहे. तसेच न्यायाधीशांचे कुटूंबीय, निवृत्त न्यायाधीश यांचाही यामध्ये समावेश असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडून न्यायालयाच्या आवारातच ही सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच सरकारने निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्येही त्यांना लस घेता येईल. न्यायाधीशांना कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड यामधील लस निवडण्याचे स्वातंत्र्य नसेल. कोविन सिस्टीमधूनच त्यांची नोंदणी होऊन त्यांना लस दिली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
शरद पवारांनी घेतली लस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात कोरोनाची लस घेतली. केंद्रीय मंत्री डाँ. जितेंद्र सिंह, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज कोरोनाची लस घेतली.
संजय राऊत यांची टीका
खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरळमार्गी नेते असून त्यांची वाटचाल काँग्रेसच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली. यावेळी मोदींचा पेहरावाबाबत राऊत यांनी टीका केली आहे. "राष्ट्रीय एकात्मता हा काही एकट्या काँग्रेसचा मक्ता नाही, नरेंद्र मोदींच्या कृतीकडे राजकारण म्हणून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहायला हवे," अशी खोचक टिप्पणी राऊत यांनी केली आहे. "मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. ते फार सळमार्गी नेते आहेत," असे राऊत म्हणाले.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.